Friday, 31 May 2019

कथा ( आता उरली फक्त सकारात्मकता )

आता उरली फक्त सकारात्मकता.....

सुंदरगांव नावाप्रमाणेच सुंदर होते. गावाभोवती उंचच ऊंच डोंगररांगा खुणावत होत्या. डोंगरावरील हिरवीगार झाडी मनाला मोहवत होती.झाडांवर पक्षांनी घरटी बांधली होती,पक्षांचा कीलबिलाट निसर्गाच्या सानिध्यात असल्याची जाणीव करुन देत होता.शांतारामलाही हे सर्व जाणवत होतं.आज त्याचे मन उद्विग्न झाले होते. अ़धाराने आपली शाल पांघरायला सुरवात केली होती. तो सावकाश जमिनीवर हात टेकून उठला.आपल्या दुर्बलतेची जाणीव त्याला पदोपदी होत होती.आपली काय अवस्था झाली आहे हे पाहून त्याला आपले तरुणपण आठवू लागले...

शांताराम आपली बायको बायजा बरोबर सुखात संसार करत  होता. त्यांच्या संसारवेलीवर अजय व संगीता अशी दोन फुले उमलली.आपल्या मुलांच्या कडे पाहून दोघेही खूप आनंदी होत.शांताराम बायजाला म्हणाला, " व्हय गं बायजा, म्या काय म्हणतो , हे बघ, आपल्याला आपल्या परिस्थितीमुळे शिकता न्हाई आलं.आपण आपल्या पोरास्नी लई शिकवायचं बघ." बायजाला हे ऐकून खूप बरं वाटायचं.ती म्हणायची, " व्हय जी , व्हय ,लय शिकवायचं आपण आपल्या पोरास्नी."शांताराम म्हणायचा , " त्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागल बघ ." मुलांच्या भविष्यासाठी काबाडकष्ट करत होते.अजय व संगीता दोघेही शाळेत जात होते.पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करत असत.गुरुजींच्या लक्षात हे आले होते. ते अजय व संगीताला म्हणाले, " हे पहा, अजय संगीता,मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तुमची बुद्धिमत्ता खूप चांगली आहे. खूप अभ्यास करून तुम्ही मोठे व्हा."

अजय व संगीताला आपल्या घरची परिस्थिती माहीत होती.दोघांनी खूप अभ्यास केला.शाळेत, अभ्यासात प्रगती करु लागले.गावात सातवीपर्यंतच शाळा होती. पुढील शिक्षणासाठी शहरात जावे लागणार होते.गुरुजी घरी आले.शांताराम व बायजाला आनंद झाला. ते म्हणाले, " या या गुरुजी. गरीबांच्या झोपडीला पाय लागलं आपलं.आनंद झाला आमास्नी " गुरुजींनी सभोवार दृष्टी फीरवली.कौलारू घर,पत्र्याचा आडोसा केलेल्या भिंती,पण जमीन सारवलेली.घरात वीजेचा पत्ताच नव्हता. हे सर्व पाहून गुरुजींना वाईट वाटले.पण या अशा परीस्थितीला सामोरे जात अजय व संगीता अभ्यासात कसे पुढं आहेत हे पाहून त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी शहरात पाठवले पाहिजे असं वाटू लागले.ते म्हणाले, " हे बघ शांताराम, तुझी दोन्ही मुले हुशार आहेत. त्यांना पुढे शिकव.शहरात पाठवं त्यांना." शांताराम म्हणाला, " अवं गुरुजी, तुमी म्हणता तेबी गरं हाय,पर आमची परीस्थिती तुमाला माहीतच हाय नव्हं.दोघांच्या शिक्षणाचा खरच आमाला नाय परवडणार." गुरुजींना काय बोलावं काय कळेना.कारण अभ्यासात अजय व संगीता दोघेही हुशार होते.दोघांनीही पुढे शिकावं असं त्यांना वाटत होते.ते शांताराम ला म्हणाले, " अरे , तुझी दोन्ही मुलं हुशार आहेत.दोघांनाही शिकवायला हवं.तेंव्हा आपण असं करु,तू अजयच्या शिक्षणाचा खर्च कर , मी संगीताच्या शिक्षणाचा खर्च करतो.पाठवू दोघांना आपण शहरात शिकायला." शांताराम व बायजाला दोघांना बरे वाटलं,अखेरीस दोघांनाही शहरात शिक्षणासाठी पाठवायचं ठरलं.

जूनचा महीना आला.अजय व संगीता दोघांना शहरात पाठवायचं होतं.गुरुजी दोघांना घेऊन निघाले. शांताराम व बायजा दोघांना काय बोलावे कळत नव्हते.दोघेही भावनाविवश होऊन आपल्या पोरांच्याकडे पहात होती. आपल्याला सोडून आपली मुले कशी राहतील त्या मोठ्या शहरात ? हाच एक विचार त्यांच्या मनात येत होता.गुरुजींनी त्यांना समजावून सांगितले.मनावर दगड ठेवून त्यांनी आपल्या पोटच्या लेकरांना शहरात पाठवले.गुरुजींनी आधीच अजयची मुलांच्या वसतिगृहात व संगीताची मुलींच्या वसतीगृहाचा सोय केली होती.दोघांनाही जवळ पडेल अशा मध्यवर्ती ठीकाणी असणाऱ्या एका चांगल्या शाळेत प्रवेश मिळवला होता.दोघांना घेऊन गुरुजी शहरात आले.ते शहरी वातावरण पाहून अजय व संगीता बावरुन गेले.दोघांनी एकमेकांना घट्ट पकडले.शहरातील माणसांची,वाहणांची तोबा गर्दी पाहून ते भेदरून गेले.अजय गुरुजींना म्हणाला, " गुरुजी, ही एवढी माणसं कुठुन येऊन कुठे चाललेत एवढ्या गडबडीत ? " गुरुजी हसले व म्हणाले ," हे बघ अजय, हे सर्व लोक आपल्याला कामासाठी जात आहेत.शहरात लोकांची संख्या जास्त म्हणून तूला गर्दी दिसते.पण घाबरु नका दोघेही.मी तुम्हाला सर्वकाही व्यवस्थित दाखवतो.ते लक्षात ठेवा." सांगितल्याप्रमाणे गुरुजींनी दोघांची शाळा,वसतिगृह दाखवली,महत्वाची ठीकाणेही दाखवली.गुरुजी म्हणाले,
" भरपूर अभ्यास करुन चांगले मार्क मिळवा,शाळेचं व गावाचं,तुमच्या आईबाबांचे नांव करा." असे सांगून ते दोघांनाही आशिर्वाद देऊन निघाले. अजय,संगीता रडू लागले,पण गुरुजींनी त्यांना समजावून सांगितले व ते परत गावी आले.

गावी आल्यावर ते शांताराम व बायजाला भेटले.सर्व हकीकत सांगीतली.दोघांचे हृदय मुलांच्या आठवणीने भरून आले. बायजाने डोळ्याला पदर लावला व हुंदके देऊन रडू लागली. शांताराम तिला समजवत स्वता:ही रडत होता.गुरुजींनी दोघांची समजूत काढली व घरी निघून गेले.आपल्या मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या घरात दोघेही उदास होउन बसले होते.पावसाळ्यात घर गळायला नको म्हणून ते शेकरुन घ्यायचे म्हटले तरी नवीन कौलं आणायला पैसा नव्हता.म्हणून तो विचार बाजूला ठेवला.थोड्याच दिवसांत वादळवाऱ्याला सुरुवात झाली. पत्रे थडथड वाजू लागली. वारा फुटलेल्या कौलांतून आत येत होता.आभाळ भरुन आले.लवकरच वातावरण अंधारुन आले.शांताराम काळजी करु लागला.," आता कसं हुयाचं गं बायजा ? "बायजाने उत्तर दिले, " आता कसलं काय घिऊन बसला धनी ? आता आपल्या हातात काय बी नाय,बघू परमेश्वराच्या मनात काय हाय कुणाला दकल." दोघांचे संभाषण असे चालू असतानाच आकाशात वीज चमकली.ढगांचा गडगडाट झाला. दोघांच्या काळजाचा ठोका चुकला.आपल्या घराचं काय खरं नाही असं दोघांना वाटू लागलं.लवकरच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वारा आडवातिडवा वहात त्यामुळे पाऊसही वेड्यासारखा सगळीकडे नाचत होता.गळक्या छपरातून पाणी खाली टपकू लागले.शांताराम व बायजाची धांदल उडाली. घरातली भांडी,पातेली,बादल्या टपकणाऱ्या थेंबाखाली ठेऊ लागले.पण पावसाचा जोर काय आवरत नव्हता.घरासमोरील झाड करकर आवाज करत झोके घेऊ लागले.कामट्यांनी पत्र्यांना बांधले होते.वाऱ्याच्या झोतापुढे त्यांच काय चालेना.पत्रे सगळे खिळखिळे झाले. कौलंही उडून खाली पडून फुटली.छपराला भगदाड पडल्यासारखे झाले होते.शांताराम व बायजाला काय करावे सुचेना.ते दोघे आगतिकपणे एकमेकांकडे पाहण्याशिवाय दुसरे काहीच करु शकत नव्हते.जमीनीवर पाणी साचलं होतं.झोपायचाही प्रश्न निर्माण झाला होता. दोघांना वाटलं बरं झालं दोन्ही पोरं हे सोसायला इथं नाहीत. त्यांनी बसूनच रात्र काढली. सकाळपर्यंत पावसाने उसंत घेतली होती.शांताराम ने बाहेर येऊन आपल्या घराची..घर कसले ते ? मोडकळीस आलेले पत्र्याचे शेड ते !!! त्याच्या डोळ्यासमोर ते एकमेकांपासून बाजूला गेलेले पत्रे ,बिनाकौलाचे ते छप्पर दिसू लागले.. त्याने बायजाला हाक मारली, " अगं ये बायजा.. ये वाईच भाईर.बघं काय परिस्थी झाल्या गं आपल्या घराची." बायजा बाहेर आली व पाहू लागली.तिने डोक्यालाच हात लावला.म्हणाली, " अरं देवा, माझ्या कर्मा,काय झालं ह्ये सारं ? आता एवढं साहित्य कुठुन आणायचा दुरुस्तीसाठी ? "
झोपडीवजा घराची पार दैना झाली होती.दारात उभा असलेला वृक्ष निष्पर्ण झाला होता.अतिशय उदास वातावरण निर्माण झाले होते.

शांताराम कंबरड मोडल्यासारखं बसून राहिला.बायजाच त्याला म्हणाली, " धनी,असं कुठंवर बसणार मग तुमी ? उठा कायतर केलचं पायजे नव्ह ? " " व्हय,व्हय,बायजा,उठतो आता,कुठं काय काम मिळतं का बघून येतो." असं म्हणून शांताराम सावकाश उठला.अंगात त्राण नसल्यासारखे त्याला वाटत होते.पण आता हे घर दुरुस्ती करायची होती,मुलांना शहरात शिकायला पाठवलं आहे.त्यासाठी पैसा तर मिळवायलाच पाहिजे.हा विचार करून तो गावाकडे चालू लागला.आता मिळतील ती कामे करायची असं ठरवत तो कामाच्या शोधात निघाला. एक सकारात्मक विचार घेऊनच....

लेखिका

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 30 May 2019

कविता ( आधार )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

आधार

भकास नजरेने पाहताना,
बघून तुम्हाला शेतीकडे.
काळजात माझ्या चर्र होते,
बाबा पहा तुम्ही माझ्याकडे.

तुम्ही दिला आधार मला,
आता मी आधार तुमचा.
गाठी मारुन बंडीला या ,
झाकते मी संसार गरीबीचा.

शिवार मोकळे दिसते,
वृक्ष उभा सावलीला.
पाईपलाईन जरी टाकली,
शोधते ती पाण्याला.

मुंडासे बांधून डोक्याला,
आधार आहे काठीचा.
लेक लाडकी सांधत असते,
फाटका सदरा बापाचा.

आशावादी रहावे नेहमी,
काम करावे नेटकेपणाने.
सामोरे जाऊ संकटांना,
लढू जोमात प्राणपणाने.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता ( जैन धर्म )

जैन धर्म

जैनधर्म सामासिक शब्द,
बनला जैन व धर्मापासून.
जैन उद्भवला जिनपासून,
अर्थात ज्याने आहे जिंकलेले.
कुणी जिंकावे कर्मास,
कुणी आत्मिक विकासास.
मिळवून सत्ता या सर्वांवर,
पंचेद्रियास मग जिंकावे.

गरज यांस श्रद्धा, चारित्र्याची,
सम्यकदर्शन, ज्ञान,  मिळवण्याची.....
स्विकारा अहिंसा मनापासून.
ठरले चोविसावे तिर्थंकर
भगवान महावीर या अहिंसेतूनच..
ठरवून शाकाहार श्रेष्ठ आहार,
थोर उपदेश दिला जनतेस.
अहिंसा परमो धर्म......
घोष दिला संदेश महान.
गरज जगी याआज जाणवते,
शाकाहाराची अन् अहिंसेचीसुद्धा..
धर्म आपला जिनांचा, त्यागाचा....
वाढवू आपल्या आचरणाने.
भविष्य आपले आपल्या हाती,
होऊन जागे धर्माला जाणा.
वाढवायचा विश्वात का घालवायचा?
भरतील संमेलने साहित्याची,
अन् कवितेचीसुद्धा.....
साहित्य आपले वाढवायचे ,
करु आत्मसात आपली मूल्ये
टाकू गाडून विकारी विचारांना,
करु प्रसार जिनधर्माचा.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 29 May 2019

कविता ( जिनवाणी )

                  जिनवाणी

धर्मतीर्थाची केली स्थापना,
ऋषभनाथ भगवंतांनी.
परंपरा ही श्रुतज्ञानाची,
चालविली महावीरांनी.

श्रुतस्कंधाला म्हणती सारे,
द्वादशवाणी जिनवानी.
पुजती ज्येष्ठ शुद्ध पंचमीला,
आगम प्रेमी विधी विधानांनी.

  प्रचलित नाव श्रूतपंचमी,
ज्ञात श्रूतवरांचा इतिहास.
जीन उत्पत्ती जीत पासून,
जिंकले ज्याने  कषायास.

वीतरागी मानव ठरला,
जिंकून मनोविकारांना.
अरिहंत म्हणती त्याला,
परास्त केले घातीयांना.

केवलज्ञान प्राप्त झाली,
कठोर तपश्चर्येणे.
  निर्दोष त्यांची वाणी ठरते,
युगपत जाण्याच्या क्षमतेने.

दिव्य ध्वनि ही महान ठरली,
संबोधली महावीर वाणीने.
रत्नत्रय हा महान धर्म,
आचरुण सम्यक, श्रद्धा, ज्ञानाने.

संबोधती तया जैन विद्या,
जया अंगी जैन तत्वज्ञान शैली.
गरज आजच्या काळाची,
जिनवाणी हरमुखी आली.

कवयित्री
  श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

कविता ( णमोकार मंत्र )

              णमोकार मंत्र

सब मंत्रों में महान मंत्र,
णमोकार का गाओ गान।
  त्याग के अपना मान सम्मान,
  वंदन करेंगे छोड़ अभिमान।

  टूटता है यहाँ अहंकार,
समर्पण भाव जगते हैं।
आत्मा निर्मल होती है ,
पंचपरमेष्ठी को भजते हैं।

णमो शब्द को समझो तुम,
प्यार से झुकना आगे तुम।
चेहरा प्रसन्ना रखो तुम,
आत्मीयता की वाणी तुम।

करो आचरण बड़े गुणों से,
नमना पंचपरमेष्ठीयों को।
मूलमंत्र ये जैन धर्म का,
उठाता है उपर मानव जाति को।

पैंतीस अक्षर अठ्ठावन मात्राएँ,
  अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय।
साधु ये पद पाँच समाए ,
कर लो हर दिन इसका स्वाध्याय।

  बोलो णमो अरिहंत को,
बोलो णमो तुम सिद्ध को।
णमो आचार्य, उपाध्याय को,
णमो तुम साधु को करो।

ऐसा है यह महान मंत्र,
कभी ना इसको भुला देना।
गाकर इसका जय जयकार,
  कल्याण खुद का कर लेना।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर

कविता ( शांतिसागर महाराज )

कविता

शांतिसागर महाराज

शतक विसावे धन्य झाले,
शांतिसागर जन्मा आले.
भिमगोंड अन् सत्यवती ,
कृतार्थ होऊन गाऊ लागले.

बाळ सातगोंडा तेज:पुंज ,
पाहताच हर्षित सारेजण.
भविष्यवाणी ज्योतिषांची,
बणनार बालक पुढे महान.

धार्मिकतेचा वसा घेऊन,
निर्मोही मन बनत गेले.
ध्यास लागला मुनीजनांचा,
परोपकारी जीवन बनले.

मुनीदिक्षा दिली देवेंन्द्रकीर्तींनी
बनले महाराज शांतिसागर .
उपदेशाने जागृत केला,
अंध:कारातील जनसागर.

संघ बनविला स्वकर्तृत्वाने,
आचार्यपद बहाल झाले.
चारित्र्य चक्रवर्ती बनले जगी,
सर्वधर्मसमभावाचे पाईक बनले.

त्यागभावना कामी आली,
सल्लेखनाव्रत कुंथलगिरीवर.
अंतिम उपदेश करुन मानवा,
देह ठेवला या धरतीवर.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

Thursday, 23 May 2019

कविता ( प्रलोभन )

प्रलोभन

प्रलोभनांच्या मागे लागून ,

मानवा, तू का असा पळशी.

समजून कधी घेणार गड्या,

कमालीचा तू रे आळशी.

कर्म तुझे हे तुलाच भोवते,

खड्ड्यात अकार्यक्षमतेच्या.

खणून ठेवला तुझ्या हाताने,

काठावर निष्क्रीयतेच्या .

जाण ,संकटा समोर आहे,

नजर त्यावर पडू दे जरा.

वैचारिक जाणिवांच्या पातळीने,

ठरवं,कोण खोटा अन् कोण खरा.

वापर सुशिक्षितपणाचा करुन,

विवेकबुद्धी जागृत ठेव .

नाही भेटणार कधीच तुला,

खऱ्या वाटणाऱ्या या पैशात देव.

जाण तू परीस्थितीला मानवा,

सत्कारणी लाव तुझे हे जीवन

करुन वापर तुझ्या बुद्धीचा,

कर जीवनाचे नंदनवन.

कवयित्री

श्रीमती माणिक नागावे

कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

लेख ( शांतिसागर महाराज )

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनादि अनंत काळापासून  तीर्थंकरांची  परंपरा चालू आहे या सर्वांनी अध्यात्माची विचारधारा पोहोचविली. संसारात राहून हे शक्य नसते.  कारण समाजात कषाय रुपी, दुर्वव्यवहारी माणसेच जास्त असतात. ज्यावेळी समाजात अन्याय, अत्याचार आपली सीमा ओलांडत त्या त्या वेळी एका युगपुरुषाने जन्म घेतला आहे आपणास माहीतच आहे. मध्यंतरीच्या काळात जुनी परंपरा  खंडित झाली होती. पण शांतीसागर मुनी महाराजांनी ही परंपरा पुन्हा चालू केली. विसाव्या शतकातील ते एक  प्रेरणा स्त्रोतच होते.

महाराजांचे पूर्वज  विजापूर भागाकडील होते. ते 33 गावचे इनाम होते. कालांतराने ते या गावी स्थायिक झाले. इथे स्वकर्तृत्वावर धनसंपत्ती मिळवली. मानमरातब मिळवला. पाटीलकी ही मिळवली.  दूधगंगा व वेदगंगेच्या काठची सुपीक जमीन, तेथील लोकांचे परिश्रम, धार्मिक वृत्ती, समतेच्या वागणुकीमुळे भोजगाव लवकरच नावारूपाला आले. महाराजांच्या वडिलांचे नाव  भीमगोंडा पाटील आईचे नाव सत्यवती होते.   या धार्मिक  माता- पित्यांचे अहोभाग्य की त्यांच्या पोटी असा पुत्ररत्न जन्मला. बाळ पोटात असतानाच तो पुढे कोणीतरी मोठा होणार याचे लक्षण दिसत होते. कारण सत्यवती मातेला जे डोहाळे लागले होते ते विलक्षण होते. त्यांना वाटायचे की आपण आगजराजा डोक्यावर मंगल कलश घेऊन, एका हातात सहस्त्रदल कमल घेऊन गजराजवर बसून जिन मंदिराकडे जावे, जाताना सर्वांना जिन मंदिरात पूजेसाठी निमंत्रित करावे व नंतर सर्वांच्या समोर ते सहस्त्रदलयुक्त कमल भगवंतांना अर्पण करावे. मातेला पडलेल्या ह्या  स्वप्नाचे प्रत्यंतर नंतर महाराजांच्या  जीवनावरून आपल्याला पाहायला मिळते.

दिवस भरतात माता सत्यवती यळगुड ला आपल्या माहेरी आल्या. आषाढ कृष्ण 6 ला 1872 मध्ये बुधवारी रात्री तिने तेज:पुंज पुत्राला जन्म दिला.  जन्मकुंडली प्रमाणे हा मुलगा अत्यंत धार्मिक वृत्तीचा कणखर वृत्तीचा,  निरोगी प्रकृत्तीचा होईल असे  सर्व भविष्य जाणकारांनी सांगितले होते. त्यांचे नाव सात गोंडा असे ठेवण्यात आले. बाळ कलेकलेने वाढू लागला. सर्वांच्या कौतुकाचा विषय बनला, पण शाळेत काही त्याचे मन रमले नाही. त्यांनी तिसरीतच शाळा सोडून दिली. त्यांची वृत्ती धार्मिकतेकडे झुकत होती. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न एका सहा वर्षाच्या मुली बरोबर झाले. पण सहा महिन्यातच ती आजाराने मरण पावली. नंतर त्यांनी पुन्हा आपल्या लग्नाचा विषय काढू दिला नाही. मनाने ते कोमल असले तरीही  शरीराने कणखर होते. ते रानात पिकांची राखण करायला जायचे. पण कधीही पक्षांना हाकलून लावत नसत. उलट छोटी-छोटी लोटकी आणून त्यात पाणी भरुन ती झाडाला बांधत की जेणेकरून त्यांना पाणी पिण्यासाठी दूर जावे लागू नये. यावरून त्यांच्या मनाचा कोमलपणा व संवेदनशीलता दिसून येते. पक्षांना म्हणत की,"  हे शेतही तुमचे व मीही तुमचाच आहे.   तुम्ही निर्भयपणे वावरा." पण आश्चर्य असे की,  त्यांच्याच शेतात धान्य खूप पिकायचे.

त्यांचा मित्रपरिवार पण मोठा होता. एकदा त्यांचा एक मित्र आत्महत्या करत होता, महाराज  त्याच वेळी त्याला शोधत तिथे गेले व त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. आलेल्या संकटावर धीराने मात कशी करायची असते हे त्याला पटवून दिले. अशाप्रकारे जीवन जगत असतानाच  त्यांच्या मातापित्यांनी सल्लेखना घेतली.  त्यानंतर महाराजांचे मनही  धार्मिकतेकडे वळू लागले.  स्वतः एक मुनी बनावे अशी जबरदस्त इच्छा त्यांच्या मनात घर करू लागली. ते आपला जास्त वेळ मुलींच्या सानिध्यात घालवू लागले. देवेंद्रकीर्ती महाराजांनी त्यांना सुरुवातीला क्षुल्लक दीक्षा दिली. तो दिवस होता 6 जून 1914. घरच्या लोकांनी सातगोंडांना खूप समजावून सांगितले, पण ते त्याच्या पलीकडे गेले होते.

आता धर्मप्रभावना, धर्मप्रसाराचे काम ते गावोगावी जाऊन करू लागले. आपल्या प्रवचनांनी ते लोकांना ते मंत्रमुग्ध करीत असत. ते लोकांना सांगत की,"  भौतिक सुखासाठी नैतिक मूल्यांना पायदळी तुडवू नका, अविनाशी आत्म्यांना जाणून घ्या, ध्यानधारणा आत्मचिंतन करा, तरच हा भवसागर पार करून जाल."  प्रसारमाध्यमांद्वारे त्यांची कीर्ती दूरवर पसरली. व त्यांच्या प्रवचनांना गर्दी होऊ लागली.  त्यांच्याप्रवचनात कधीही पुनरावृत्ती नसे. समुदाय कशा प्रकारचा आहे तशा प्रकारचे त्यांचे बोल असायचे.

गिरनार पर्वत हे प्रथम जैन आगम षटखंडगमाचे जन्मस्थळ आहे जैन धर्मियांचे अत्यंत पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे. अशा पर्वतावर जेंव्हा महाराज गेले तेंव्हा तिथे त्यांना विशेष वैराग्य प्राप्त झाले. त्यांच्यात विरक्ती भाव इतका उफाळून आला की त्यांनी अंगावरील वस्त्र कायमचे सोडून दिले व ते ऐल्लक बनले. वाहनात बसायचे नाही असा निर्धार केला. लोकांना मार्गदर्शन करताना त्यांना  रुचेल ,पचेल अशा पद्धतीने ते करत. संगीत नाही वातावरणात गाणी गाऊन सुद्धा त्यांनी लोकांना उपदेश केला. षडरिपुंचा त्याग  करायला शिकवले. स्वाध्यायाचा ध्यास लावला. सोहळ्याचे स्तोम माजवणे, अस्पृश्यांना कमी लेखणे त्यांना अजिबात आवडत नसे. धर्माच्या, दिखाऊपणा च्या ते विरोधात होते. सर्वांशी प्रेमाने वागावे व संयमाने राहावे असे ते सांगत. अनेक वेळा त्यांनी सम्मेद शिखरजी ची यात्रा पूर्ण केली. या कठीण यात्रेतही त्यांनी अनेक वेळा अनेकांना विविध प्रकारे मदत केली व त्यांचे दुःख दूर केले.

1929 साली  द्रोणागिरी पर्वतावर ध्यानाला बसल्यानंतर एक वाघ त्यांच्यासमोर बसला जराही घाबरले नाहीत. महाराजांच्या दर्शनाने त्या वाघातील क्रूरता नष्ट झाली व शांत भावनेने त्यांच्या सानिध्यात थोडावेळ थांबून निघून गेला. त्यांचे हे धैर्य वाखानण्याजोगी आहे. त्यांना चातुर्मासाला नेण्यासाठी चढाओढी लागत असत. समाजातील मिथ्यत्व व घालविण्यासाठी महाराजांनी आजन्म परिश्रम घेतले. त्यांचा ज्ञानघटातून नेहमी सदाचाराचा पाझर होत असे.अनेक उपसर्ग झेलूनही त्यांनी आपली तपसाधना कधीही भंग होऊ दिले नाही. यामुळे सर्वदूर त्यांची इतकी ख्याती झाली की हा अध्यात्मिक हिरा पाहण्यासाठी लांबून लोक हजेरी लावत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू लोकांच्या समोर उलगडत होते. त्यांच्या विचारांनी प्रबोधनाचा झंजावात सगळीकडे ज्ञानप्रकाश पसरवत होता. त्यामुळे 7 एप्रिल 1924 ला सर्वांनी एकत्र येऊन मुनिश्री 108  शांतीसागर महाराजांना " आचार्य "  पद बहाल केले. विसाव्या शतकातील ते पहिलेच म्हणे होत. आचार्य पद दिल्या दिवशीच  आचार्यश्रींनी श्री.  वीरसागर मुनींना व नेमीसागर मुनींना  निग्रंथ दिगंबर दीक्षा दिली. 31 वर्षे ते आचार्य पदावर राहिले.

सर्व जाती-धर्माच्या लोकांबद्दल त्यांच्या मनात आत्मीयता होती. त्यांची ख्याती इतकी वाढली होती की बागणी व  परिसरातील करबल खेळणारे व रिवायतु गाणाऱ्यांनी शांतिसागर महाराज यांच्यावर गीत गात हा खेळ खेळत असत. अशाप्रकारे त्यांच्याबद्दल प्रेम भावना आदरभावना वाढीस लागली. ते शांतीचे सागर होते. अहंकाराचा लवलेश ही त्यांच्यात नव्हता. 1925 साली श्रवणबेळगोळ येथे महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी शांतिसागर महाराज देवेंद्रकीर्ती महाराज एकमेकांस भेटले. तेव्हा शांतीसागर महाराजांच्या दर्शनाने ते इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांना वाकून नमस्कार केला व पुन्हा त्यांच्याकडून पुनर्दिक्षा घेतली. अशाप्रकारे गुरुजींनु शिष्याकडून मुनी दिक्षा घेतल्याची घटना जैन इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली.

बागेवाडी ते गुराळ चालू करण्या अगोदर बकरा बळी दिला जायचा. तेव्हा तेथेही त्यांनी सर्व जैन व अजैनांना एकत्र बोलावून संदेश दिला व ती प्रथा बंद पडण्यास सांगितले.काही बरेवाईट झाले तर स्वतः बळी जाण्याचा विचार मांडला. नमोकार मंत्राने गुऱ्हाळाची सुरुवात केली व नेहमीपेक्षा जास्त फायदा करून दाखवला.अशाप्रकारे तिथली बळी प्रथा बंद पाडली ती आजतागायत बंद आहे. उत्तर भारतात विहार करताना भयंकर अशा नागसर्पाला ते धीराने सामोरे गेले व त्याला शांत केले असे ते शांतीसागर होते. प्रवचन ऐकायला त्यांनी बांधवांनाही त्यांनी जवळ बोलावून घेतले. जैन धर्माच्या या अस्मितेने पूर्ण जगाला अध्यात्म तेजाने उजळून काढले व अनेकांचे कल्याण केले. धनगर लोक सुद्धा शांतीसागर यांची गीते गात असत.

25 मे 1945 रोजी त्यांनी जैन साहित्याच्या संवर्धनासाठी श्री चारित्र चक्रवर्ती शांतीसागर दिगंबर जैन जिनवानी जिर्णोध्दार संस्था, फलटण येथे स्थापन केली. व त्या ठिकाणी मौलिक ग्रंथांचे संरक्षण केले. त्यांच्या सुजाण, निर्मळ चारित्र व आचरणामुळे सन 1950 ला त्यांना " चारित्र चक्रवर्ती " या उपाधीने गौरवले गेले. काळाच्या कसोटीवर पारखून तावून-सुलाखून ते आणखीनच उजळून निघाले होते. जैनांचे अस्तित्व टिकविण्यासाठी व त्याला स्वतंत्र धर्म म्हणून जोपर्यंत मान्यता मिळत नाही तोपर्यंत मी अन्नग्रहण करणार नाहीत अशी त्यांनी भगवंतासमोर मनोनिग्रह केला. शेवटी 16 ऑगस्ट 1951 ला शासनाने अनुकूल निर्णय दिल्यानंतर त्यांनी अन्नग्रहण केले. धर्मरक्षणार्थ प्राणार्पणाची तयारीही त्यांनी दाखवली होती.

प्रकारे अनेकांचे जीवन कृतार्थ केल्यानंतर या महामानवाला दुसरेच वेध लागले. त्यांच्या मनात विरक्ती भाव जागृत झाला दुसऱ्या जगाकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. सर्वप्रथम त्यांनी मोठ्या मनाने सर्वांची माफी मागितली. सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकला... सर्वांना कळून चुकले की आता काय होणार आहे. हा पावन आत्मा परमात्म्यात विलीन होऊ इच्छित होता. मोक्ष स्थानाला जवळ करू इच्छित होता. सर्व शक्ती आत्म चिंतनात, धर्म ज्ञानात लावली. कुंथलगिरी वर त्यांचे सल्लेखना व्रत सुरू झाले. त्यांनी इंगिनी मरण साधले. म्हणजे शेवटपर्यंत कोणाकडूनही सेवा करुन घ्यायची नाही. सल्लेखनाच्या 36 व्या दिवशी रविवार दिनांक 18 सप्टेंबर 1955 ला सूर्योदयानंतर सहा वाजून पन्नास मिनिटांनी अमृतसिद्धीयोग असताना निर्वाण झाले. एक क्षण सर्व जग स्तब्ध झाले.. या निश्चयाचा महामेरू ला वंदन करण्यास झुकले. त्यांच्या त्या तेजोवलयाने व संस्काराने आपण आपला उद्धार करून घेऊया.व म्हणूया,

  "  संस्काराचे अमृतसिंचन आचार्यांनी केले,
    भक्तगणांचे रोमरोमही उल्हसित झाले.
      शांतीसागर प्रखर ज्योतीने सर्वांना
         दिपविले,
      " स्वयंप्रकाशी "  आम्ही व्हायचे वेध नवे
         लागले.

  लेखिका 
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर