Sunday, 13 May 2018

कथा ( तीच्या घरी सुखी राहुदे )

स्पर्धेसाठी

ग्रामीण कथा

शिर्षक - तीच्या घरी सुखी राहूदे

सूर्य मावळतीला चालला हुता . कडुसं पडायला लागलं हुतं.शेतावरची कामं आवरुन आयाबाया गावाकडं बिगीबिगी जायला निघाल्या. शेतकरी गडी आपली औजारं सावरत बैलगाडी हाकू लागली.बैलं दुडकत गावाकडं निघाली.त्यांच्या गळ्यातील घुंगुरमाळा गोड आवाज काढू लागल्या.घुंगरांच्या आवाजात त्यांच्या चालीला एक लय आली हुती .घरी जायची सर्वांनाच घाई हुती.दिवस बुडायच्या आत गावशिवारात एकेकजण येत हुता.गडी माणसं मधीच पारावर टेकत हुती अन् गप्पा मारण्यात दिवसभराचा शिण घालवत हुती .बाया हातपाय धुवून जरा अंगणात टेकल्या.ज्यांच्या सुना हुत्या त्यासनी आयता च्या मिळाला.ज्यांच्या नव्हत्या त्यांनी थोड्यावेळाने करुन पीला.मग सुरु झाली सांजच्या सैपाकाची तयारी.जेवणखाण झालं का मग सगळ्या आयाबाया अंगणात येऊन बसायच्या व ऊशीरपातूर गप्पांचा फड रंगायचा.

गावात सातवीपतूर शाळाअसल्यामुळं बऱ्याच पोरी सातवीनंतर घरीच काम शिकायच्या.एकमेकांच्या घरी जाणयेणं असायचं .सुशी , पिंकी , कमली ,शरी शबाना , आशिया ई. आपसात खेळत.पोरबी त्यांच्याबरोबर खेळायची.सगळच आलबेल चाललेलं.त्यांच्यातीलच एक म्हणजे सातवी झालेली
शबाना अल्लड वयातील पोर.घरच्या परिस्थिती मुळं जास्त शिक्षण घेता न आल्यामुळं घरीच आईला कामात मदत करत असे.कशाची दगदग ना घाईगडबड , त्यामुळे निवांत सगळे चालायचे . दुपारचा वेळ कामाची आवराआवर झाल्यावर सगळे आरामात असायचे , कुणी वामकुक्षी घ्यायचे.पडवीत झोपियचे

शबाना मग कधी घरात दूरदर्शनवर कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवी कींवा शेजारच्या काकूंच्या घरी जाई.सुनील वीस वर्षाचा देखणा तरुण.बोलायलाही छान होता.तसे दोघेही अल्लड वयातीलच .दोघेही एकमेकांशी बोलायची . गप्पा मारायची. हळूहळू दोघांना एकमेकांबरोबर बोलणं , सहवास चांगला वाटू लागला .मग दोघांच्या नजरेची भाषा व भावनांची देवाणघेवाण नकळत सुरु झाली. दोघेही हळूहळू एकमेकांकडे ओढले जाऊ लागले. सुनील च्या घरी शबाना चे येणेजाणे वाढलं.
माळ्यावर पिकायला टाकलेलं आंबा जसा पिकत होता अगदी तसच सुनील आणि शबाना च प्रेम गोड होत होतं..जशी झाडावरच्या चिंचे ची गोडी लागावी तशी गोडी सुनील ला लागत होती..गावातून हिंडून फिरून दमून आलेला सुनील शबाना दिसली की अगदी चिंचेच्या झाडागत मोहरून जायचा.. खेड्यातल् हे उनाड प्रेम मोगऱ्यारखं फुलत होतं

सुनिल ची आई विधवा स्त्री , चार घरची भांडी , धुणी करुन मुलांना तीने वाढवले हुतं .तीला आपल्या मुलांकडनं खूप अपेक्षा होत्या. बापाचे छत्र नसलं की धाक दाखवायला कुणी नसलं तर मंग मुलं अंदाज घेत्यात व नकळत ती वाईट मार्गाला लागत्यात. त्यांच्यावर योग्य वेळी अंकुश नाही ठेवला तर कालांतराने ती निर्ढावत्यात व नंतर हाताबाहेर गेले की आवरता आवरत नाहीत.पण आईने जर योग्य वेळी खंबीर होऊन कडक निर्णय घेतले तर मुलांना जरब बसते.याचाच फायदा सुनील च्या लहान भावाने घेतला.त्यो वाईट संगतीला लागला  चोऱ्या माऱ्या करु लागला. पोलीस एकदादोनदा घरी येऊन गेलं.आजूबाजूला बदनामी झाली.सुनील ने त्याला वडीलकीच्या नात्याने खूप समजावून सांगितलं, पण सारे व्यर्थ गेलं.

याचा परिणाम व्हायचा त्योच झाला. त्यो असा झाला की शबाना च्या घरचं तीला त्या घरी पाठवनास झालं. आता दोघांच्या भेटी होत नव्हत्या.दोघांच्या ही नकळत प्रीतफुलाचा सुगंध दरवळत हुता.त्यानला एकमेकांची ओढ लागली हुती. पण भेटणार कसं ? प्रश्न निर्माण झाला. मग काहीतरी कारण काढून बाहेर जाऊन ऊभं राहू लागले. माळावर , देवळाच्या मागं एकमेकांशी भेट घेऊ लागले.मावळतीच्या सूर्याला साक्षी ठेवून आणाभाका,शपथा घेतल्या जाऊ लागल्या.मोगऱ्याच्या फुलागत शबाना सुनीलला मोहवू लागली.तोपण वेड्यासारखं तीच्या मागं मागं करु लागला.

शबाना च्या घरच्या लोकांच्या नजरेस ही गोष्ट आली.मग काय तीच्यावर बंधनांचा डोंगर आला.सतत पाळत ठेवणं आलं.प्रेमांकुर अजूनच रुजत हुता.प्रेम हे स्प्रींगाप्रमाणे असतं.त्याला जेवढं दाबाल तेवढं ते जास्त वेगाने ऊसळतय.तसेच दोघांचबी झालं.एकमेकाबद्दलची अनावर ओढ शांत बसू देत नव्हती. भर ऊनात तापून आल्यावर सावलीची अपेक्षा आसते न नाही मिळाली की तगमग जास्तच वाढते.अगदी तसच या दोघांचही झालेलं .समाजबंधनामुळे ते भेटू शकत नव्हते.मग त्यांनी घेतला एक भयंकर निर्णय .घरातून पळून जाण्याचा.!!!दिवस ठरला ,!! वेळ ठरली . !!

शबाना आईबरोबर बाहेर गावच्या बाजारात गेली हुती . ठरलेल्या वेळी सुनील गाडी घेऊन ऊभा राहीला. फोन तीच्याकडे नव्हता .संपर्क कसा साधणार ? त्याने खूप वेळ वाट पाहीली.शेवटी तो तिथून निघाला.आईबरोबर फीरताना बैचैन शबानाने गर्दिचा फायदा ऊठवत आईपासून बाजूला होण्यात यहस्वी  झाली. गडबडीने एका फोनच्या दुकानात जाऊन सुनील ला फोन लावला.त्याचे नियोजन सगळे कोलमडले हुते.तरीपण तो आला .दोघांची भेट झाली .आता वेळ घालवण्यात अर्थ नव्हता . व दोघं मिळून गाव सोडून निघाले. धाडशी निर्णय ! कुठे जायचे ? काय खायचे ? सर्व प्रश्न गौण होते यावेळी.

शबानाच्या आईने आरडाओरडा केला.नवऱ्याला कळविलं. ती डोकं बडवून घेऊ लागली.तीचा तो आकांत ऐकायला शबाना कुठं हुती ? ती निघाली हुती एका अनिश्चित अशा प्रवासाला.!!गांव तसं छोटच हुत पण बाजाराचा दिवस असल्यामुळं गर्दी खूप हुती.शबानाचे वडील आपल्या सवंगड्यांना घेऊन आलं.शोधाशोध झाली, पण व्यर्थ ! शेवटी रितसर पोलीसांत तक्रार नोंदवण्यात आली.

पोलिसांनी तपासचक्रे वेगात फीरवली .दुसऱ्या च दिवशी सुनील च्या एका मित्राच्या घरातून दोघांना पकडून आणलं गेलं.दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हतं.शबानाचे वडील ,त्यांचे मित्र व नातेवाईकांच्याबरोबर पोलीसस्टेशनमध्ये आले.त्यांचा तो अवतार पाहील्यावर शबानाने सांगितलं की मी जर घरी गेले तर मला वडील मारून टाकतील.मला सुनीलबरोबरच रहायचे आहे.पोलीसांनी समजावून सांगितले. वडीलांच्या समोर तीला आश्वस्त केल.खूप मिनतवाऱ्या करुन शेवटी ती घरी जायला तयार झाली.तीचं लग्न सुनीलबरोबरच करु पण नंतर ,असे सांगून तीला घरी नेण्यात आलं.

सुनीलला अज्ञान मुलीला पळवल्याबद्दल शिक्षा झाली. तुरुंगवास झाला.भविष्य अंधारात बुडालं.पण आता ऊपयोग काय ?काही महीन्यानंतर शबानाचे त्यांच्याच जातीत लग्न लावून दिल गेलं.तीने खूप विरोध केला पण काय ऊपयोग झाला नाही. सुनीलला हे जेव्हा कळाले तेव्हा त्याला खूप दूःख झाले. पण तो समझदार हुता.त्याने शबानाला आपल्या मनातच ठेवले.प्रदर्शन केलं नाही. तेवढा शहाणपणा दाखवला.

मध्ये एकदा दोनदा शबानाने सुनीलला फोन करुन बोलण्याचा प्रयत्न केला पण यावेळी सुनील ठाम राहिला. तो म्हणाला, "तुझ्या घरी तू सुखी रहा "

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment