Monday, 31 December 2018

लेख (सरत्या वर्षाला निरोप )

स्पर्धेसाठी

लेख

विषय- सरत्या वर्षाला निरोप

आज तूझा या वर्षातला शेवटचा दिवस म्हणजे ३१ डिसेंबर २०१८.गेलेले वर्ष म्हणजे तू आणि तूझ्याबद्दलच्या माझ्या भावना मी व्यक्त करत आहे. गतवर्ष म्हणजेच सरते वर्ष माझ्यासाठी खूप छान गेले. सरत्या वर्षात माझ्या साहित्यिक प्रवासाला चांगलीच गती मिळाली आहे. विविध प्रकारच्या स्पर्धांत मी भाग घेतला.विविध साहित्यिक समुहात सामिल झाले. त्यांनी अनेक प्रकारच्या स्पर्धा घेतल्या .त्या स्पर्धेत मी हिरिरीने सहभाग नोंदवला. अनेक स्पर्धेत मी यशस्वी झाले. मनाला खूप आनंद झाला. लिखाणाला गती व विविध विषय मिळाले. विविध वृत्तपत्रांत विविध विषयांवर माझे लेख छापून आले.वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मी खूप खूष झाले.

विविध सामाजिक प्रश्नांवर बोलता आले. मार्गदर्शन करता आले. साहित्य संमेलनामध्ये सहभाग नोंदवता आला.मनापासून मनातले विचार प्रकट करण्याची संधी मिळाली. खरचं हे वर्षा तू माझ्यासाठी चांगला गेलास.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी तब्येत छान राहिली. मी स्वतःसाठी वेळ काढला.रोज पंचेचाळीस मिनीटे मी. चालणे चालू केले.त्यामुळे तब्येतीला थोडे बरे वाटले.मी तरतरीत राहिले. माझ्यामुळे कुणाला त्रास होईल असे मी वागले नाही. कींवा कुणीही माझ्यासोबत वाईट वागले नाही ही एक जमेची बाजू आहे.  "एकमेकां सहाय्य करु अवघे धरु सुपंथ " या ऊक्तीप्रमाणे आपण जर दुसऱ्याला वेळोवेळी मदत केली तर तेही वेळप्रसंगी आपल्याला मदत करतात हे खरेच आहे. शेजारधर्म पाळल्यामुळे एकमेकांना समजावून घेतल्यामुळे वाद निर्माण न होता सुसंवाद घडला. एकमेकांच्या सुखद:खात सामील झाले.

आज आपण पहात आहोत की चांगल्याबरोबर वाईट गोष्टीही घडतात.पण जसे सुख व दु:ख , अंधार व प्रकाश , जय व पराजय या सर्वांना एकमेकांशिवाय शोभा नाही तसेच वाईट गोष्टी घडल्याशिवाय चांगल्या गोष्टींची कींमत कळत नाही. तसेच आयुष्यातील चढ ऊतार हे गेले वर्षभर होत गेले , पण यातून नवीन काहीतरी शिकत गेले.अनुभव हा मोठा गुरु असतो. अनुभवाने मानव शहाणा बनतो.  " पुढच्यास ठेच मागचा शहाणा " याप्रमाणे सारासार विचार करुन जीवनात पावले टाकली.बरीचशी योग्य पडली .काही चुकली पण लगेच दुरुस्ती ही केली .त्यामुळे पूर्वानुभव पुढच्या गोष्टीत महत्त्वाचा ठरला. अधिकार वाणीने दुसऱ्यांना सांगता येऊ लागले. कारण कोणतीही गोष्ट स्वतः अनुभवतो तेंव्हाच ती पूर्णपणे समजते,ऊमगते.

कौटुंबिक स्वास्थ ही ऊत्तम असल्यामुळे निराश,नाराज अशी परिस्थिती उत्पन्न झाली नाही. नाही म्हणण्यापेक्षा जेंव्हा असा प्रसंग आला त्याला धीराने, सकारात्मकतेने स्विकारले त्यामुळे त्याचा बाऊ झाला नाही. जीवनात हे असे प्रसंग येतच राहणार, अशी मनाची धारणा करुन घेतली होती.

कोणत्याही गोष्टींचा गवगवा केला अकारण त्याला अवास्तव महत्त्व दिले तर त्यापासून अपेक्षा पूर्ती झाली नाही तर मनाला दु:ख होते म्हणून जे आहे ते स्विकारत गेले. जेवढे जमेल तेवढे करत गेले. जे बरोबर आले ते माझे,नाही आले ते माझे नव्हतेच ही भावना ठेवली व मी निवांत आहे.

हे सरत्या ,गतवर्षा तू मला खूप अनुभव दिलास. मी खूप खुष आहे.येणाऱ्या वर्षात तुझ्या अनुभवाची जी शिदोरी मला मिळाली त्याच्या आधारावर मी माझी स्वप्ने, आशा-आकांक्षा, ईच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार.मला यामध्ये तुझी खूप चांगली मदत मिळणार आहे.तूला निरोप देताना मन जडावतं.कारण मागील,सरत्या वर्षातील अनेक अनुभव हे मनाला सुखावणारे होते.त्यामुळे मन नेहमी प्रफुल्लीत रहात होते.पण काळ कोणासाठी थांबत नाही. गेलेला वेळही परत येत नाही. म्हणून वेळ ही संपत्ती मानून तीचा योग्य वापर केला पाहिजे. कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यावा हे मागील अनुभवांवरून लक्षात येत असते.येणाऱ्या भविष्यात तुझ्यामुळे मी योग्य पावले टाकीन.तूझा अनुभव खासच आहे.तुझे मनापासून धन्यवाद. तूला मी आनंदाने निरोप देते.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

बालकविता ( बालवाडी )

स्पर्धेसाठी

महास्पर्धा पर्व २ रे

फेरी क्र.३

विषय- किलबिल बालवाडी

प्रकार - बालकविता

शिर्षक- बालवाडी

किलबिल किलबिल ऐकू आली,
बंटी बबली आले आले.
नाही पाटी नाही पुस्तक,
ईकडे तिकडे धावू लागले.

बालवाडीतील बालचमूंचा ,
गलका ,दंगा चालू झाला.
कोणी लागले जोरात रडू,
कोणी मोठ्याने हसायला.

आठवण काढून आईबाबांची,
ईवली ईवली झाली चेहरे.
बाईंनी म्हटली गाणी सुंदर,
बालचमू झाले नाचरे.

गमभण एक दोन तीन चार,
एकसुरात सारी म्हणती.
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक,
नाचत नाचत गाणे गाती.

डबा छोटा ऊघडला,
खाऊ खायला सुरु केले.
चिऊकाऊच्या घासांनी,
सगळेच मग फस्त झाले.

कोड क्रमांक LMD@215

Sunday, 30 December 2018

चारोळी ( सूर्यास्त )

चारोळी

सूर्यास्त

अस्तांचलगामी भास्कर सांगे
येऊ ऊदयास नवस्वप्नांसवे
गतसालातील टाळून ऊणिवा
नवअपेक्षांच्या संकल्पनेकडे जावे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

Tuesday, 25 December 2018

कविता मुक्तछंद ( प्रेम )

स्पर्धेसाठी

मुक्तछंद

विषय- प्रेम

प्रेमाच्या या जगात,परीवारात,
आज बांधले ईमले उंच उंच
हवेतच चढले मजल्यावर मजले,
प्रत्यक्षात कारवाई शून्यचं .
मातापित्यांच्या पदरी निराशा,
सुपुत्रच ठरलायं कुपुत्र आज.
धाडून वृद्धाश्रमात आईबाबांना ,
खोटी सहानुभूती दाखवी जगी.

शोधतो जगी जो तो प्रेम,
संस्काराच्या तिजोऱ्याच आता,
पडल्यात ओस अन् भकास .
अनुकरणप्रीय येणारी संतती,
बोध घेईल खास खरा,
हेण असते जीवन समजून,
धाडतील आपल्याला वृद्धाश्रमी.

नातीगोती विस्कटून गेली,
या स्वार्थांध, वासनांध दुनियेत.
नाही सापडणार प्रेम इथे,
भेटतील फक्त जिवंत प्रेते.
विषण्ण मनाची समजूत ,
काढेल का कोणी अलवार ?

सांभाळायची आहे भावी पिढी,
नका मारु तुम्ही ऊडी या खाईत.
सांभाळून ठेवूया प्रेम अन् नाती,
भविष्यातील येणाऱ्या पिढीसाठी.
पेरालं तसचं उगवणार येथे,
कलियुगाचा हाच संदेश.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

चारोळी ( सण नाताळचा )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- सण नाताळचा

सण नाताळचा हा आला
प्रभू येशू भूवरी जन्मला
झाला मोद चहूकडे जगी
प्रेषित जगी अवतरला 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता अष्टाक्षरी ( उघड्यावरचं जीणं )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

अष्टाक्षरी

शीर्षक - उघड्यावरचं जीणं

मांडलाय संसार मी
असा हा उघड्यावर
नाही तमा नाही चिंता
चाललय पूर्वापार

रानी घेतला आसरा
आकाशाचं पांघरुन
संसाराच्या गोधडीला
घेतलयं आंथरुन

सर्जा-राजा बैलजोडी
देते साथ जन्मभर
घेती विश्रांती रानात
कापायचं ते अंतर

बाळ माझा मांडीवर
पितो पाणी मायहाती
खुशी पाहून दोघांची
आसमंत साथ देती

विखुरली भांडीकुंडी
आग पोटाची शमली
तान्हा झाला समाधानी
लेक ऊभी ती सानुली

बाजेवर विसावला
संसाराचा अर्धा भार
तिकोट्याने हो पेलला
पांघरुन नी चादर

उघड्यावरचं जीणं
नशिबाचा असा भोग
समाधानी तरी जगी
नाही मिळाला तो योग

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( नववर्षाचे स्वागत ).

नववर्षाची चारोळी

नववर्षाच्या स्वागताची
तयारी करु नवसंकल्पाने
संघर्षमय या दुनियेचे
स्वागत करु आनंदाने

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( स्त्री मुक्ती )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय-- स्त्री मुक्ती

परंपरेच्या जोखडातूनी
सुटण्या स्त्री मुक्ती धडपडते 
आखून नव्या वाटा,योजना
नामी युक्ती त्यास्तव स्विकारते

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 19 December 2018

लेख ( अंत एका ध्यासपर्वाचा )

😢😢 अंत एका ध्यासपर्वाचा 😢😢

सकाळी सकाळी एक बातमी समजली व काळजात चर्र...झाले. एक क्षणभर काही सुचेना.जेष्ठ दिग्दर्शक मा. यशवंत भालकर सरांचे आकस्मिक निधन... विचारच खुंटले.... यशवंत भालकर एक हसरं सतत धडपडणारे एक ऊत्साही व्यक्तीमत्व. सावित्रीच्या लेकी या ग्रुपच्या माध्यमातून सरांची ओळख झालेली.मला सावित्रीची लेक- आदर्श शिक्षिका पुरस्कार मा.यशवंत भालकर सरांच्या हस्ते मिळाला तेंव्हा मला खूप आनंद झाला होता. तेव्हापासून ते ग्रुपच्या माध्यमातून संपर्कात होते.ग्रुपमधील सदस्यांच्या सुखदु:खात सहभागी व्हायचे.सगळ्यांना प्रोत्साहन देत असत. मला तर नेहमी प्रेरणा द्यायचे.मुलांची,तब्येतीची आस्थेने चौकशी करत.आमच्या शाळेचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम होता.एवढा मोठा कार्यक्रम घ्यायचा तर त्या तोलामोलाचा पाहुणा हवा.माझ्या डोळ्यासमोर भालकर सर आले.पण ते येतील का ? असा शी शासंकता मनात होती.सहज मी फोन केला व येणार का विचारले अन् काय आश्चर्य ते लगेच हो म्हणाले.माझ्या तर आनंदाला पारावर राहिला नाही. तो कार्यक्रम खूप छान रितीने पार पाडला.अगदी शेवटपर्यंत हसतमुखाने वावरले.सर्वींना खूप बरे वाटले.माझ्या मनात सरांच्या बद्दलचा आदर आणखीन वाढला.त्यानंतर मी माझ्या कवितासंग्रह काढणार म्हटल्यावर माझ्याकडून कविता मागवल्या व वाचून छान अभिप्राय दिला.मला शुभेच्छा ही दिल्या एवढच नव्हे तर त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन व्हावे या माझ्या इच्छेला दुजोरा देत सर्वात प्रथम हजर राहिले व तोंडभरून माझं व माझ्या पुस्तकाचं कौतुक केलं.मला नेहमी सावित्रीची लेक,बोला कवयित्री असं म्हणून बोलवायचे.ते शब्द अजून कानात घुमत आहेत.कोण बोलवणार आता ? खरचं सर तुम्ही खूप वेगळे व महान होतात.अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळ आहे.एवढा मोठा दिग्दर्शक पण अजिबात कशाचाही, कसलाच गर्व,अभिमान नव्हता.त्यामुळे आम्हाला सर्वांना ते कुटुंबातील सदस्यच वाटायचे.गरीब- श्रीमंत असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असत. रंकाळा बचाव मोहीमेत सक्रिय होते.त्यांचे लिखाण रंकाळ्याभोवतीचं सामावलेले होते. विद्यापीठाच्या सिनेटपदी नेमणूक झाल्यानंतर त्यांनी अनेक योजना राबविल्या. दररोज व्यायाम न चुकता करणाऱ्या , सतत हसतमुख राहून दुसऱ्यांना हसवत ठेवणे,आधार देणे हे कौशल्य त्यांच्यात होते.अशा माणसाचा मृत्यू असा अचानक व्हावा हे न पटण्यासारखे आहे. सुबक साहित्य कलामंचच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी आम्ही कवयित्री हा कार्यक्रम घेऊन आम्हा कवयित्रींना प्रोत्साहन दिले व सन्मान केला.भविष्यात या माध्यमातून आपण काय करणार आहोत याबद्दल दिलखुलास चर्चा केली.या सगळ्या आता कल्पनाच राहिल्या.या कल्पना पूर्ण तरी होऊ द्यायचं होतं. का दैवाने असा घाला घातला असेल बरं? ऊत्तर नाही सापडत.सर तुम्ही हवे होतात.पण नियतीपुढे कुणाचेच चालत नाही. पण एवढ्यात हे व्हायला नको होतं.. त्यांच्या आशा आकांक्षा खूप होत्या. त्या तरी पूर्ण व्हायला हव्या होत्या.सगळंच अनपेक्षितपणे घडलं.अविश्वसनीय आहे सगळं..आम्हाला आधार देणारे,प्रोत्साहन देणारे शब्द आम्हाला आता पुन्हा ऐकायला मिळणार नाहीत. मायेचा हात आणि दयाळू नजर आता आम्हाला दिसणार नाही. आपल्या आत्म्यास चिरशांती लाभो.हीच साश्रूपूर्ण नयनांनी श्रद्धांजली.🙏🙏🙏😢😢😢

साद घालतो आम्ही तुम्हास
याल का परतूनी या भूवरी 
आस आम्हा आपल्या आशिर्वादाची
या परतूनी तुम्ही सत्वरी .

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर.
9881862530

Tuesday, 18 December 2018

हायकू ( खोपा )

स्पर्धेसाठी

हायकू

विषय- चित्र हायकू

शिर्षक-- खोपा

सुगरणीची
जोडी शोभे सुंदर
कार्यतत्पर

मादी निवांत
नर बांधे घरटे
छानसे छोटे

दोन मजले
वर आणिक खाली
त्यांची हवेली

टांगले वर
विणकराने छान
दोलायमान

आश्वस्त तीही
दाखवून विश्वास
जोडी ही खास

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 17 December 2018

चारोळी ( बहिणीची माया )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- बहिणीची माया

बनून प्रतिरूप आईचे सदा
वर्षाव करते बहिणीची माया
अनुभवून प्रेम तुझे निस्वार्थी
पुलकित होते ताई माझी काया

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

Sunday, 16 December 2018

हिंदी लेख ( शाहू महाराज का शैक्षणिक कार्य )

छत्रपती शाहू महाराज का शैक्षणिक कार्य

जिसतरह कमल का फूल कीचड को सुगंधित करता है। सागर कीमती मोती सीप के माध्यम से देता है।ऊसीतरह शाहू महाराज भी महात्मा फुले,डॉ. बाबासाहब आंबेडकर के विचार अपने आचरण में लाया। कोल्हापूर का नाम महाराष्ट्र के साथ साथ देशमें भी कीया। महाराज महान क्रांतीकारक गरीबोंके मसिहा, तथा शोषितोंके मित्र तो शोषकोंके लिए काल थे। आप एक महान शिक्षणप्रसारक थे। कोल्हापूर के शैक्षिक प्रगती में ऊनका बहुत बडा सहभाग है।

शाहू महाराज सामान्य व्यक्ती नहीं थे, तो राजाओंके राजा थे। अत्यंत सिधे सरल मनके , स्वभावके महाराज का जन्म छब्बीस जून अठारह सौ चौरहत्तर को कोल्हापूर में हुआ। ऊनका मूल नाम यशवंतराव था। दत्तकविधान के बाद वे शाहू बन गये।

जब उन्होंने राज्यकारोभार जिम्मेवारी अपने ऊपर ली तब उन्होने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्य में पूरा ध्यान लगाया। अगर अपने समाज को आगे लाना है तो उन्हे शिक्षा देना जरुरी है, यह उन्होंने जान लिया  और शिक्षा सबको मिलनी चाहिए यह जानकर शिक्षा का प्रसार कीया। सदियोंसे अज्ञान के अंधेरे में गोते खानेवाले दलित समाज को शिक्षा का सही रास्ता दिखाया। जातीपाती के बाहर आकर बहुजनसमाज को शैक्षिक सहुलीयत देकर प्रेरित कीया। प्राथमिक शिक्षा सख्तीका और मोफत कीया। वसतिगृह भी निर्माण कीया। स्त्री- शिक्षापरभी ऊनका विशेष ध्यान था।लडकीयोंको फीस में सहुलीयत दे दी गयी थी। अपनी विधवा स्नुषा को भी जननिंदा सहकर पढाया। महाराज के प्रयास से कोल्हापूर " दक्षिण काशी " के साथ साथ " शिक्षण काशी" के नाम से भी जानी जाने लगी। समाजपरिवर्तन के लिए शिक्षा का उपयोग कीया।  उन्होंने सैनिकी स्कूल, टेक्नीकल स्कूल शुरु कीया था। शिक्षा प्रगतीके रथ का पहिया है,समतताकी चाबी है,ऊद्योग की जननी है तो उत्कर्ष की गुरुचाबी है ऐसा वे मानते थे। शिक्षाके सहारेही उन्होंने ब्राम्हणेतर समाज को ब्राह्मण समाज के साथ लाकर बिठा दिया।

ऐसा शैक्षणिक महान कार्य करनेवाले राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्वातंत्र्य- समता- बंधुता के प्रचारक सबके लिए प्रेरणादायी हैं और हमेशा रहेंगे।

लेख
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
9881862530

Saturday, 15 December 2018

लेख ( शेतीमालाला हमीभाव द्या )

माझं ही ऐका साठी

शेतमालाला हमीभाव द्या!!

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतातील शेतकरी दिवसरात्र आपल्या शेतात कष्ट करत असतो.आपल्या घरादाराची सारी जबाबदारी त्याच्यावर असते.आपण बाजारातून एखादी वस्तू विकत घेतो.त्यावेळी त्यापाठीमागील शेतकऱ्यांचे कष्ट आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे आपण त्या शेतमालाची किंमत खूप कमी करत असतो. मॉलमध्ये विचार न करता भरमसाठ खर्च करणारे आपण शेतकऱ्यांचा माल विकत घेताना किंमतीमध्ये कमालीची घासाघीस करतो.त्यावेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आगतिक, असहाय्य भाव आपल्याला का बरं दिसत नाहीत. आपला तो पोशिंदा आहे, तो जर काम करत नाही असे म्हणाला, जर संपावर गेला, किंवा जर त्याने बंड पुकारले सर्व समाजविरुद्ध तर.... काय होईल कल्पनाच करवत नाही. ज्याच्या जीवावर आपण जगतो त्यालाच आपण किंमत देत नाही. आजची परिस्थिती तर खूपच दयनीय आहे. कांद्याने तर शेतकऱ्यांना अक्षरशः रडवले आहे. फायदा तर सोडाच पण घातलेले भांडवलाचे ,मजुरीचे पैसेही त्याच्या हाताला लागत नाहीत. यासारखे दुर्दैव कोणतेच,कुठल्याही देशात नसेल.सरकारची आश्वासन पुर्तीमधील कमालीची उदासीनता,मालाला हमीभाव मिळत नाही. कर्जमाफीचा फुसका बार ,सकस बीयानांचा अपुरा पुरवठा,अनियमित वीजपुरवठा, पाण्याची कमतरता,मजुरांचा अभाव अशा कीतीतरी समस्यांना आजचा शेतकरी तोंड देत आहे. आजचा शेतकरी या सर्व दुष्टचक्रात अडकला आहे.त्याच्या मनाची द्विधा मनस्थिती झाली आहे. कुटुंबातील लोकांसाठी जगावे का कर्जाच्या बोझ्याखाली गुदमरुन आत्महत्या सारखा पर्याय निवडावा का फासावर जावे? त्याला कळेना झाले आहे. सावकारीचा अक्राळविक्राळ हात त्याच्या नरडीचा घोट घेत आहे. जनावरांची , बैलांची अवस्था ही दयनीय झाली आहे.अच्छे दिन कधी येणार ? का या फक्त घोषणाच राहणार. चालू सरकारने तर शेतकऱ्यांना जगणेच नकोसे केलयं. दिलेली आश्वासने फक्त मतं मिळवण्यासाठीच होती का? यक्ष प्रश्न आहे.काँग्रेस सरकार म्हणते आम्हाला निवडून द्या आम्ही तुमची परिस्थिती बदलतो. पण आता कुणावर कीती व कसा विश्वास ठेवायचा हे कळेनासे झाले आहे. शेतकरी कीती दिवस हे सहन करणार? कुणी आहे का वाली? देता का कुणी न्याय या  शेतकऱ्याला ?

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर, 
9881862530

बालकविता ( परीराणी )

स्पर्धेसाठी

बालकविता

विषय -- परीराणी

परी गं परी ,
आहेस का बरी.
येतेस का तू ,
माझ्या घरी.

पांढरे शुभ्र पंख तुझे,
ऊडत येतेस भरभर.
शोधतो आम्ही,
तूला गं घरभर.

जादूची छडी,
हातात शोभते.
कशी काय बाई,
तू जादू करते ?

पायात बूट,
तूझ्या चंदेरी.
दिसतेस मला,
तू खूपच भारी.

ईवले ईवले,
तूझे डोळे छान.
हळूच कलवतेस,
ईवलीशी मान.

हसरा चेहरा,
पाहून परीराणीचा.
आनंद वाटतो बालचमूला,
अनुभव छान खेळण्याचा.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रकाव्य अष्टाक्षरी ( दुष्टचक्र )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

अष्टाक्षरी

विषय - दुष्टचक्र

दुष्टचक्र फिरतयं,
माझ्या रोज डोक्यावर.
समजेना काय करु,
जगू ? जावू फासावर ?

सावकार आवळतो,
फास माझ्या गळ्यावर.
देऊ कसा आता पैसा,
पीक नाही खळ्यावर ?

घरदार सारं गेलं,
चंद्रमौळी नाही आता.
हाती काय माझ्या आलं ?
कोण आहे माझा त्राता ?

शेतकरी काळजीत,
चिंता आभाळभरुन.
मन ऊदास झालयं,
आले डोळे ओलावून.

हात विक्राळ केसाळ,
गोळा करतो कमाई.
आगतिक असहाय्य,
करु कशी भरपाई ?

बैल करतो विचार,
धनी कसा ऊभारेल ?
गाडी जोडून शेतात,
कसा बरं मी धावेल ?

दुष्टचक्र थांबेल का ?
अच्छे दिन येतील का ?
पोशिंद्याला जगताना,
समाधान लाभेल का ?

© कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
9881862530

Tuesday, 11 December 2018

चारोळी ( इच्छापूर्ती )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय-- इच्छापूर्ती

सतत झटावे अखंडीतपणे ,
करण्या पूर्ण आपली इच्छापूर्ती.
साध्य ईप्सित करण्यासाठी करा
प्रयत्न , होईल हो कामनापूर्ती

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

चित्रकाव्य बालकाव्य ( मनीमाऊ )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

बालकविता

शिर्षक-- मनीमाऊ

मनीमाऊ मनीमाऊ,
अंग तुझे किती मऊ .

गोजिरवाणे तुझे अंग,
पाहून सारे झाले दंग.

गुबगुबीत तुझे गाल,
डोळे दिसतात हिरवे लाल.

लुसलुशीत तुझे पाय,
आवडे तुला दुधाची साय.

वाघाची मावशी म्हणती सारे,
आंजारतात,गोंजारतात सारी पोरे.

पितेस दुध वाटीभर,
फिरतेस तू घरभर.

तोंड वर करुन काय विचारतेस,
म्याव म्याव करुन ओरडतेस.

दात तुझे अनकुचीदार,
वाटे बाई भिती फार.

नाक लाल ईवले ईवले,
कशाने बरे असे झाले ?

बसली आहेस फरशीवर,
लागत असेल ना थंडगार?

कान ईवले टवकारले,
कोण तुला काय बोलले?

लक्षात ठेव एक गोष्ट,
सांगून ठेवते तुला स्पष्ट.

मनीमाऊ मनीमाऊ,
चोरुन दुध नको पिऊ.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( व्यथा मांडतो मी )

स्पर्धेसाठी

झटपट चारोळी स्पर्धा

विषय- व्यथा मांडतो मी

काव्यातून आज व्यथा मांडतो मी
समाजातील या कथा सांगतो मी 
परिवर्तनाचा ध्यास असा मनी 
घेऊन शब्दांनी जगी लढतो मी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 10 December 2018

चारोळी ( संकल्प )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - संकल्प

यशस्वी जीवनात गरज आहे
संकल्प ठाम मनात धरण्याचा
करु पाठपुरावा ध्येयसिद्दीचा 
गौरव होई सहज विजयाचा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 8 December 2018

चित्र चारोळी ( शिदोरी )

स्पर्धेसाठी

चित्र चारोळी

चढतोय मी वाट गदर्भासंगे 
वाट जरी बिकट असली तरी
तेजाळती रविकिरणे साथीला
घेऊन काठी हाती  पाठी शिदोरी 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 5 December 2018

चारोळी ( महापरिनिर्वाण दिन )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषत - महापरिनिर्वाण दिन

महापरिनिर्वाण दिन महामानवाचा 
निर्मितीकार भारतीय संविधानाचा 
मंत्र दिला शिकून संघर्ष करण्याचा
केला उद्धार समाजबांधवांचा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता ( ज्ञानियांचा राजा )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय -- ज्ञानियांचा राजा

                  ( १ )

थोर संत योगी तत्वज्ञानी
प्रवर्तक भागवत संप्रदायाचे
लिहून भावार्थदीपिका महान
व्यक्त विचार तत्वज्ञानाचे

               ( २ )

ज्ञानियांचा राजा थोर ज्ञानेश्वर
प्रेरणा आध्यात्मिक लोकशाहीची
दिधले सकल जनांना ग्रंथातून
महती मराठी संस्कृतीची

              ( ३ )

ज्ञानियांचा राजा ज्ञानदेव 
निवृत्तीनाथ सद्गुरु तयांचे 
संकल्प ज्ञान संस्कृत भाषेतील
पाकृत मध्ये आणायाचे

             ( ४ )

वर्णिली महती मराठी भाषेची 
लिहील्या ओव्या नऊ हजार
दुजा ग्रंथ जीव-ब्रम्ह ऐक्याचा 
तत्वज्ञानाचा केला प्रचार

            ( ५ )

केले गर्वहरण चांगदेवाचे
लिहून चांगदेव पासष्टी
केले तीर्थाटन अमृतानुभवानंतर 
समाधीमरणाची झाली पुष्टी 

             ( ६ )

लिहून पसायदान वांछीले
ईच्छा पुऱ्या व्हाव्या सर्वांच्या
माऊली म्हणती संप्रदाय वारकरी
पाया रचला तीरी चंद्रभागेच्या 

             ( ७ )

संजीवन समाधी इंद्रायणी काठी
मावळला ज्ञानसूर्य सहजच
प्रणाम तुजला एकवीस वय
झुकतो माथा आपसूकच

कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर