Tuesday, 16 September 2025

चारोळी ( स्वावलंबन)

 - स्वावलंबन
 नको अवलंबून दुसऱ्यावर 
काम स्वतःचे स्वतःच करू 
अथक परिश्रमात आनंदाने 
श्रम साफल्याची कास धरू

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

Sunday, 14 September 2025

चारोळी (हिंदी भाषा )

 – हिंदी दिवस

हिंदी जनमानसकी भाषा
है हमारी प्यारी राजभाषा 
साहित्य की विधा खूब इसमें
है सारे भारतीयोंकी आशा 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

Saturday, 13 September 2025

चारोळी ( तूफान)

- तुफान

मनाच्या खोल खोल डोहात 
तुफान घोंगावतयं विचारांच
नाही सापडतं उत्तर सहजी
स्मरण करावे सकारात्मकतेचं

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

चारोळी (नातं मनातलं )

विषय - नातं मैत्रीचं 

फुलत जातं दिवसेंदिवस 
नातं मैत्रीचं एकमेकातलं 
निस्वार्थी प्रेमाची एक निशाणी 
जाणून घेते सहजच मनातलं 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

Tuesday, 9 September 2025

कविता (साडी )

पारिजात साहित्य समूह आयोजित उपक्रम शृंखला अस्तित्व आणि महत्त्व 
दिनांक 10/9 / 2025 
विषय -  साडी 

शिर्षक - मोह साडीचा

मोह साडीचा झाला नाही 
शक्यच नाही बाईच्या जातीला 
कितीही कपाट भरले तरी 
साडीच नाही मला नेसायला 

विविध रंगी विविध पोतांच्या 
प्रकार अनेक मोहवणाऱ्या 
साड्या खुलून दिसती ललनांना 
दिसता आवडीने नेसणाऱ्या 

द्योतक भारतीय संस्कृतीची 
हर नारीचे सौंदर्य खुलवते 
सहावारी असो वा नऊवारी
मानसिकता सहज फुलवते 

खानदानी सौंदर्य खुलते 
तलम रेशमी साड्यातून 
भपकेबाज रंगातून 
काही दिसती उभ्या माड्यातून

भाग महत्त्वाचा आहे पदर 
राहतो सदैव मुलांच्या डोईवर 
आली संकटे कितीही समोर
झेलती सहज ती हातावर 

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

Monday, 8 September 2025

चारोळी ॰(साक्षरता )

 : साक्षरता 

साक्षरतेचे प्रकार तरी कीती 
ज्ञानार्जन ध्येय सर्वाचे असे
शिक्षणाची गंगोत्री वाहे झरझर
सर्व ज्ञानक्षेत्रांची आहे मनी वसे 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे, कुरुंदवाड

Sunday, 7 September 2025

लेख ( पर्जन्याचा महिमा )

महिमा वर्षाऋतुचा

तप्त ज्वाळांनी काया ही करपून गेली,
  तुषारात पर्जन्याच्या मन मोहून गेले.
गाऊ महिमा किती वर्षा ऋतूचा,
आनंदाच्या शब्दसरि या नाचू लागल्या.

खरंच यावर्षीचा उन्हाळा आपल्याला अजिबात सहन होत नव्हता. शरीराची काहिली तगमग होत होती.  उन्हाचा चटका इतका होता की घरातून बाहेर पडणे अशक्य वाटत होते. चोवीस तास पंख्याची गरज भासत होती. पण शेवटी तो कृत्रिमच ना ?  गरज होती ती पावसाची, पर्जन्याची, मनाला ,शरीराला, वातावरणाला आराम देणाऱ्या गारव्याची !!  पर्जन्याचा महिमा किती सांगितला, किती गाईला तरी तो कमीच आहे ,अपुराच वाटेल.

झाडे ,वेली ,पशुपक्षी, मानव सारे वातावरण  ऊन्हाच्या ज्वाळांनी  तगमगत होते. पावसाच्या प्रतीक्षेत  सर्वजण चिंतातुर होते. पावसाच्या आगमनाची वाट पाहत होते. नदी, नाले,विहिरी ,पाण्याचे साठे या सर्वांतील पाण्याची पातळी अतिशय खालावली होती. काही ठिकाणी तर ते कोरडे पडलेले होते. जलचरांची अवस्था तर अतिशय वाईट झालेली होती. काही भागात प्यायलाही पाणी नव्हते. जिथे माणसाला प्यायला पाणी नाही तिथे जनावरांची काय कथा ?  वनस्पती कोमेजू लागल्या होत्या. सर्वत्र निराशेचे वातावरण झाले होते. आणि या सर्वांची मनीषा, प्रार्थना फळास आली. सर्वत्र आनंदाचे ,हर्षाचे वातावरण झाले

अचानक आकाशात ढग जमू लागले, विजा चमकू लागल्या. वातावरणात अंधार दाटू लागला. सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. चराचर झोपेतून जागे झाल्यासारखे वाटू लागले. एक गोड शिरशिरी शरीरात पसरली. निराशेची जागा आशेने घेतली. हळूहळू पावसाला सुरुवात झाली. जलधारा पृथ्वीकडे वेगाने धावू लागल्या. धरणीमातेने आपले दोन्ही हात पसरून त्यांना आपल्या कवेत येण्याचे निमंत्रण दिले. आकाशातील जलधारा व धरणीमाता यांची गळाभेट झाली. आहाहा !!!  काय ते दृश्य सुंदर होते !!!  मातीचा सुंदर सुवास सगळीकडे पसरला होता. सारा आसमंत अल्हादित झाला.पावसाचा कण आणि कण धरणीमाता आपल्यात सामावून घेऊ लागली. वनस्पतींनी पर्जन्यवृष्टी झेलण्याकरता आपले दोन्ही हात पसरले. ते आनंदाने डोलू लागले. लहान मुले पावसात भिजण्यासाठी घरातून बाहेर आली व गाणे म्हणत पावसात भिजू लागली. त्या निरागस चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडत होते. शेतकरी राजा इतका खुश झाला की जणू त्याला त्याच्या पोटच्या मुलाचे प्राण परत आल्या सारखा आनंद वाटत होता. काही दिवसांपूर्वीची भेगाळलेली , पाण्यासाठी आ वासून पडलेली जमीन त्याला आठवली व आत्ताची पाण्याने तृप्त झालेली जमीन जेव्हा त्याने पाहिली तेव्हा खरंच त्या समाधानाचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे. त्याच्या डोळ्यात आनंदाचे आणि समाधानाचे अश्रू आले. त्या अश्रूंची किंमत मोत्या पेक्षा जास्त होती. नदी-नाले पाण्याने भरून वाहू लागले. तगमग, तडफड जाऊन समाधानाची लकेर सर्वत्र पसरली. सर्वत्र आनंदाचे चित्र दिसू लागले. वर्षा ऋतु चा महिमा किती सुखावह आहे ,किती महत्त्वाचा आहे हे सर्वांना पटले.  पावसाशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे. जल म्हणजे जीवन हे सर्वांना पटले. पाऊस जर झाला नसता तर काय झाले असते?  या विचारानेच थरकाप उडाला ! पाऊस न पडण्याच्या पाठीमागची कारणमिमांसा  पाहायला गेले तर  यालाही  मानवच कारणीभूत आहे हे लक्षात आले. स्वतःच्या स्वार्थासाठी, उद्योगधंद्यासाठी, शहरीकरणांसाठी, रस्ता रुंदीकरण करण्यासाठी मानवाने बेसुमार झाडांची कत्तल केली. जंगले नष्ट केली.हिरव्यागार जंगलांच्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी केली. याचा वाईट  परिणाम झाला. झाडे तोडल्यामुळे जमिनीची धूप थांबली. पावसाने हात आखडता घेतला. याचा वाईट परिणाम मानवा बरोबर निसर्गालाही भोगावा लागला.  यासाठी सर्वांनी पर्यावरण रक्षणासाठी, वृक्षसंवर्धनासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे. चला तर मग झाडे लावूया ,झाडांचे संवर्धन करूया. महिमा वर्षाऋतूचा जाणून घेऊया.

झाडे लावू झाडे जगवू घोष हा न्यारा,
जलधारांनी भरलेला मेघ आम्हा प्यारा.
जाणून महिमा पर्जन्याचा हे मानवा,
पर्यावरण रक्षणाची कास तुम्ही धरा.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
९८८१८६२५३०

चारोळी ( धाक )

 विषय  धाक

लहानांना नेहमी असावा 
मोठ्यांचा आदरयुक्त धाक 
सहज उठून दिसेल मग
आयुष्याचा सुंदर परिपाक 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

Saturday, 6 September 2025

बालकाव्य ( सुट्टीतील मजा )

 - सुट्टीतील मजा 

खूप खूप अभ्यास करून 
पेपर लिहिले छान छान 
सुट्टीचा महिना लागला आता 
गाऊया गोड गोड गान 

काय करूया कुठे जाऊया 
बनवूया मस्त मस्त बेत आता 
आनंदाने मारून उड्या गाऊया 
खेळ खेळूया गाणे गाता गाता 

मामाच्या गावाला जाऊया 
अंगत पंगत जम्माडी जम्मत 
सारे मिळून चिंचा बोरे खाऊया 
शिकरण पोळीची जमवू पंगत 

सहल काढू सारे जाऊ गावाला 
बागेत फिरु पळू भरभर सारे
नवनवीन दोस्त बनतील छान 
मिळवूया साऱ्यांची वाहवा रे

गड किल्ले चढून पराक्रम करू 
साक्ष इतिहासाची साठवू मनात 
वीर पुरुषांची माहिती जमवून
महती गाऊ तानात तानात

मजा सुट्टीतील लय लय भारी 
आवडते मजला आवडते सर्वांना 
चला चला सारे जण जमून
करूया साजरा सुट्टीचा महिना 

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

विचार ( शिक्षकाची भूमिका )


*ओटीटी आणि इंटरनेटच्या जमान्यामध्ये ‌ संस्कारमय समाज निर्मितीसाठी शिक्षकाची भूमिका ‌महत्वपूर्ण आहे का?*

समाजामध्ये कितीही आधुनिक तंत्रज्ञान आले असले व त्यांनी शिक्षकांची भूमिका घेतली तरी सुद्धा शिक्षकाचे महत्व हे कधीही कमी होत नाही व होणारही नाही. इंटरनेटच्या जमान्यामध्ये शैक्षणिक, बौद्धिक व संस्कार देणारे अनेक कार्यक्रम सचित्र पाहायला मिळतात पण त्यामध्ये भावना अजिबात नसतात. संस्कारासाठी, जिवंत समाज निर्मितीसाठी शिक्षकाची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. कारण विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याकरिता एक निर्जीव वस्तू नाही तर सजीव व्यक्तीची गरज असते. भले इंटरनेटच्या द्वारे अनेक माहितीचा महासागर त्यांच्यासमोर ओसंडून वाहत असला तरी सुद्धा प्रत्यक्ष शिक्षकांनी शिकवलेले ज्ञान हेच लक्षात राहते.

श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

चारोळी ( चंद्र आहे साक्षीला )

:-चंद्र आहे साक्षीला 

आठवांचे बांध साचले उरी
मनीचा चंद्र आहे साक्षीला 
आकाशातील तारे चमकती
प्रकाशाने अंधार आहे प्राक्षीला

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

चारोळी ( महालक्ष्मी )

महालक्ष्मी 

महालक्ष्मी स्तोत्र वलय शोभे
सालंकृत सुहास्य वदनी माता
पंकजासनी विराजे पद्मासनी 
कलश संपत्तीचा शुभाशीर्वाद हाता 

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

चित्र चारोळी ( चंद्रमौळी झोपडी )

 चित्र चारोळी ( चंद्रमौळी झोपडी ) 

चंद्रमौळी झोपडी आसऱ्याला 
संसार वयोवृद्धांचा साथीने चाले
सजवली रांगोळी निगुतीने दारी
प्रसन्न वाटे मागे हिरवाई डोले

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

चारोळी ( आवाज मनाचा )

 - आवाज मनाचा 

बाकी सारे बोलायलाच असतात
आवाज ऐकावा मनाचा
शेवटी निस्तरनारे आपणच 
विचार नसावा जनांचा

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर 
९८८१८६२५३०

चारोळी ( शरदाचं चांदणं )

 - शरदाचं चांदणं

रात्रीच्या चांदण्यात गेलो 
शरदाचं चांदणं बघायला
शुभ्र पांढरा गोलाकार चंद्रमा
डोकावून लागला हसायला

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

विचार ( चरण )

 :- चरण

आईच्या चरणावर स्वर्ग भेटतो असे म्हणतात ते सर्वार्थाने खरे आहे. ज्यावेळी आपण आई वडिलांच्या चरणावर डोके ठेवतो व नतमस्तक होतो त्या वेळेला आपण आपल्या मनातील सर्व अहंभाव बाजूला सारून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी लहान होऊन लीन होतो. अशावेळी आपले पालक आपल्याला सकारात्मक ऊर्जा असलेला आशीर्वाद देत असतात. कारण माता पिता आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता नेहमीच करत असतात. व आपली मुले नेहमी यशाच्या शिखराकडे जावीत, यशस्वी व्हावीत असेच त्यांना वाटत असते. त्यामुळे जेव्हा आपली मुले चरणावर डोके ठेवतात त्यावेळेला ते नेहमी मुलांच्या भविष्यासाठी चांगला आशीर्वाद देतात. म्हणून आपण नेहमी आपल्या आई वडिलांच्या चरणावर नतमस्तक व्हावे, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत, लीन व्हावे.
चरण या शब्दाचा दुसरा अर्थ कवितेचे कडवे किंवा पद असे होते. आपले भाव या कवितेतून कवी व्यक्त करत असतो. कवितेच्या चरणातून कवीला काय म्हणायचे आहे व या कवितेचा अर्थ काय आहे हे वाचणाऱ्याला ते चरण वाचून कळत असते.
त्यामुळे चरण या शब्दाचा अर्थ आपण कोणत्या अर्थाने वापरतो त्या पद्धतीने वाचकाने घ्यावे. 

लेख
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( पश्चाताप )

पश्चाताप 

औषध जालीम पश्चात्ताप 
सुधार मात्र हवा करायला
चुकातूनच अनुभव गाठीशी 
म्हणून नको परत चुकायला

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

कविता ( वेग )

 वेग

गतीमानता असावी जरी 
 चुकता कामा नये दिशा
उर्मी मनात सदैव असावी 
जागृत चेतना असावी आशा

वेगावर नियंत्रण,सुखाला आमंत्रण 
ध्यानी ठेवावे वचन भारी
नियम असतात पाळण्यासाठी 
विसरून जाते जनता सारी 

अपघात आहे ठरलेलाच 
अतिवेगामुळे जातो जीव 
रस्त्यावरच्या पाहता कसरती 
वाटते तरुणाईची मनात कीव

जीवन आहे अनमोल गड्या
यशासाठी वेग हवा खरा
देतो संदेश काळ जनाला
अनियंत्रित वेग नाही बरा

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( पतंग )

 - पतंग

पतंग आशेचा उडाला गगणी
निर्धाराचा मांजा हाती धरला 
सुखदुःखावर हेलकावे खात 
यशो शिखर गाठण्या वर निघाला

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( ही वाट दूर जाते )

 - ही वाट दूर जाते 

सुखदुःखाची नागमोडी वळणांनी
आयुष्याची अनगढ वाट दूर जाते 
भावभावनांचा होतो आपसूक निचरा 
मन मंदिर माझे सहजी सुखी होते 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( हृदयी जागा तू अनुरागा )

- हृदयी  जागा तू अनुरागा

हृदयी जागा तू अनुरागा 
जोडून बंधना जागवी प्रीत 
नकळत फुलते मनात रुजते 
हीच आहे अनोखी रीत 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( वेड शब्दांचे )

वेड शब्दांचे

वेड शब्दांचे सारस्वतांना 
भावभावनांच्या प्रकटीकरणाला 
शब्दा शब्दांचा हार विचारांचा 
सज्ज होऊया जन जागरणाला 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( आसूसलेले किनारे )

    आसूसलेले किनारे

आयुष्याच्या संध्याकाळी निवांत 
नात्यांची वाट पाहती किनारे आसुसलेले 
भाव भरल्या आसक्त नजरांनी 
लोचने मात्र आसवांनी डबडबलेले

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( जा उडून पाखरा )

 जा उडूनी पाखरा

आयुष्याच्या रंगमंचावर खेळताना 
शोधती सर्वजण आपला आसरा 
बाळगून निस्वार्थी सेवाभाव जीवनी 
जा उडून मानवरुपी पाखरा 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चित्र चारोळी ( चूल )

- चूल

चटके सोसून चूल शिजवे अन्नाला
जणू प्रतीकच मानवी जीवनाची 
सुखदुःखाच्या जीवन चुलीवर 
 चवच न्यारी या जेवणाची 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( फुल गुलाबाचे )

 -गुलाबाचे फुल

 फुल गुलाबाचे प्रतीक प्रेमाचे 
प्रेम भावना व्यक्त करण्याचे 
नाना रंगात नाना भाव दडले
काम दोन हृदयांना जोडण्याचे

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चित्र काव्य ( फणसाचे गरे )

 - फणसाचे गरे 

दिसती जरी काटे फणसावरी
मोहवती मनाला मऊ मऊ गरे
सोन पिवळा रंग लेवून विसावले 
खाण्या आसुसले लहान थोर सारे

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( हिरवीगार वसुंधरा )

- हिरवीगार वसुंधरा 

गर्द हिरवाईच्या बाहुपाशात 
हिरवीगार वसुंधरा विसावली
निळ्या आकाशात वरती
मेघांची रांग दिसू लागली

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( प्रेमा काय देऊ तुला )

 - प्रेमा काय देवु तूला 

तुझ्या प्रेमाच्या गावी येऊन 
प्रेमा काय देऊ तुला सांग आता 
हृदय तर तू घेतलेस आधीच
जपून तेवढे ठेव तू जाता जाता 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( मातृदेवो भव )

 मातृदेवो भव

जीवन हे आई तुझ्याचसाठी
तुझ्यामुळेच मी जग पाहीले
नसे दुजा महान कोणी इथे
चरणी तुझ्या मी मला वाहीले

   ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

चारोळी ( अस्तित्व)

  अस्तित्व

 अस्तित्व म्हणजे वावर जीवनातला 
स्वतःचे असणे नसणे जाणवून देणारा 
नसल्यावरही जाणवते अस्तित्व 
तोच खरा जीवनाचा नारा 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी कोडं ( आम्ही दोघे)

 आम्ही दोघे

 शेजारी शेजारी आम्ही दोघे 
भेट कधी ना होते आपली 
पाहतो आम्ही सर्वांना सर्वत्र 
स्वतःला पहायची इच्छा राहिली.

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( शब्दांच्या या सुगंधी वाटा)

. शब्दांच्या ह्या सुगंधी वाटा.

मन मोकळे करून सोडतात 
शब्दांच्या ह्या सुगंधी वाटा 
अक्षररूपी प्रकट होतात 
जसा धाग्यांना विणतो धोटा 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( रविवार माझ्या आवडीचा)

 - रविवार माझ्या आवडीचा 

आठवड्याचा शिण घालवतो
भरपूर मिळते झोपायला 
रविवार माझ्या आवडीचा 
कविता गवसते लिहायला

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चित्र काव्य ( प्रेम दिवस)

 - प्रेम दिवस 

संगणक झाले तो आणि ती 
गुलाबी टोपी निळ्या पडद्यावर 
भाव मिश्किल असती डोळ्यात
 फुल गुलाबी साहेबी टोपीवर

प्रेमाचा दिवस चल साजरा करू 
आजचा दिवस विश्रांती घेऊ 
जाणून घेण्या एकमेकाचे मन 
हात एकमेकांचा हाती घेऊ

चौकोनी चेहऱ्यावर गुलाबी ओठ 
कीबोर्ड सांगे गुज मनीचे 
माऊस आहे मदतीला तयार
सी पी यु म्हणजे प्रतिक हृदयाचे

दिवस व्हॅलेंटाईनचा करू साजरा 
संदेश प्रेमाचा एकमेकां देवू
हवाच कशाला खास दिवस? 
रोजच एकमेकांना सहाय्य देऊ 

अणाभाकांनी वचनबद्ध होऊ 
नवीन तंत्रज्ञान जगास कळवू 
झाले पूजन फुलांनी आपले 
प्रेम साऱ्यांचे सहज मिळवू 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चित्र काव्य( मिरची मोर)

काव्यप्रेमी शिक्षक मंच ®️
 राज्यसमूह आयोजित मंगळवारचा साप्ताहिक चित्रकाव्य उपक्रमासाठी 

विषय- चित्रकाव्य

शिर्षक - मिरची मोर

कलाकृती सुंदर साकारली 
मनाला सहज मोहवून गेली 
हिरवा मिरची मोर पाहता 
आजीच्या गाली कळी खुलली 

गोलाकार मोर साकारला 
मिरच्यामधून कौशल्य साकारले 
कल्पना आजीची मना भावली 
मांडणीतून तिच्या ते उतरले 

सुबकता पाहता मन आनंदले 
तिखट मिरची लोचनी सुखावे 
पिसाऱ्यासह अंग चितारले 
पाहताना वाटे बघतच रहावे 

शिल्लक दिसे डालग्यात मिरची
बाजूला ढीग दिसतो कशाचा?
लाल तिखट दिसते वाटीत 
तो कुठे अन् कसा वापरायचा? 

शेजारीच ठेवलयं पाणी प्यायला 
पेरू ठेवलेत तोंडी लावायला 
लवकर लवकर सारे या 
कौतुक आजीचे करायला

संदेश यातून एकच मिळतो 
नकारात्मकता घालवायची
तिखट सौंदर्य साकारून 
सकारात्मकता मिळवायची

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड. जिल्हा कोल्हापूर 
९८८१८६२५३०

कविता ( सुंदर बालपण)

 - सुंदर बालपण

वेळ आणि सुंदर बालपण
हरवल्यावरच छान वाटतात 
गेल्यावर शोधतो आनंदी क्षण
पण ते फार दूर गेलेले असतात 

पावसाळ्यातील धमाल मस्ती 
दारातून वाहती ओहळ छान 
प्रवाहीत जलात कागदी नावा
मार्गस्थ होतात गात गान

उतरती छपरे कौलारू छत
शोभून दिसतो विटकरी रंग
हिरवाईच्या कुशीतला गारवा
समाधानात होती सारे दंग 

पागोळ्यावरुन टपटपते पाणी 
पाट वाहती झुळझुळ दारी
छोटुकल्यांचे खेळ बालपणीचे 
असते त्यांची मौजच न्यारी

आनंदाचे भरते ओसंडते 
भावा-बहिणींचे प्रेम दिसते 
भिजल्या अंगाची ना तमा तयास
प्रसंगाची या आज गरज भासते

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( शोध यशाचा)

शोध यशाचा 

शोध घेणे मानवप्रकृती सदा
यशासाठी प्रयत्नशील रहावे
निकड गरजेची लावते कामा
श्रमातच ईश्वर सर्वांनी पहावे

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड,ता.शिरोळ, जिल्हा.कोल्हापूर

चारोळी ( उब मातृत्वाची)

- उब मातृत्वाची

उब मायेची वात्सल्याची बाळा
कुशीत मातेच्या बाल्य निवांत 
निरागसता बालकाच्या ओठी
सागर मातृत्वाचा असे सुशांत 

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर.

कविता ( कोजागिरी पौर्णिमा)

 कोजागिरी पौर्णिमा
 शीर्षक-पौर्णिमेचा चंद्र 

उजळतो सहर्ष वदनी नभात
पौर्णिमेचा चंद्र कोजागिरीला
सात्विक, पौष्टिक दुग्ध प्राशन 
तोटा न या आनंदी समाधानाला 

रात्रीच्या चांदण्यात गेलो 
शरदाचं चांदणं बघायला
शुभ्र पांढरा गोलगोल चंद्रमा
डोकावून लागला हसायला

उजळतो सहर्ष वदनी नभात
पौर्णिमेचा चंद्र कोजागिरीला
सात्विक, पौष्टिक दुग्ध प्राशन 
तोटा न या आनंदी समाधानाला 

चंद्र आहे साक्षीला आज रात्री
केशरी दुधाची लयलूट करुया
एकमेकांच्या साथीने आपसूक 
बंध रेशमी अलवार वाढवूया

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( आनंद आश्रू)

: आनंदाश्रू

मनाच्या गाभाऱ्यात येते उधाण 
वाट मोकळी आनंदाश्रू वाहती 
जणू वाटे मिलाफ सुखदुःखाचा
आकांक्षा मनाच्या पुर्ण होती 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

आठोळी ( निसर्ग माझा सखा)

 - सखा माझा निसर्ग 

सृष्टी सजली नाना रंगाने
फुलवण्या सज्ज सकल जना 
रुप मनोहर पाहून हर्षली उरी
समाधान सात्विक लाभते मना

सखा माझा निसर्ग सभोवताली 
सुख दुःखाची देतो संभावना 
उपकृत सदैव रहावे जगती
हिच खरी ठरते जगी उपासना

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर 
९८८१८६२५३०

आठोळी ( आशा)

:- आशा

सहनीय जीवन होते 
ज्यांच्या मनी आशा असते
संकटांच्या मालिकांत सहजी
निराशा फशी पडताना दिसते 
सकारात्मक विचारांनी मनी
यश आले जवळी भासते 
जीवावर आशेच्या सरीजण
मोहर यशाची आपसूक ठसते

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड तालुका शिरूर जिल्हा कोल्हापूर.

चारोळी ( अक्षय राहो प्रीत)

 - अक्षय राहो प्रीत

टिकवण्या नाते नात्यामधले 
अक्षय राहो प्रीत आपल्यात
नको दुरावा,नको संशय कोणता 
फुलत जाते सहजी विश्वासात

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( जीवन चक्र)

:-जीवन चक्र 

गरजेचे कर्तव्य करत राहणे
जीवनचक्र तरच पुढे जाईल 
सुखदुःखाची झोळी भरता
आपोआप समाधान होईल

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( देहाचे चंदन व्हावे)

.. देहाचे चंदन व्हावे.

असे झीजावे कर्माने जगी
देहाचे या चंदन व्हावे 
गंधाळतील मग चहुदिशा 
नश्वर शरीर हे मागे उरावे. 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( लाल जास्वंद)

लाल जास्वंद 

 फुलला मोहक लाल जास्वंद 
भासते मना जणू गणेशमूर्ती
गुण औषधी आयुर्वेदी असती
पसरे चहुबाजू याचीच कीर्ती 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( गरुड झेप)

 - गरुड झेप 

यशाची असो वा महत्त्वाकांक्षेची
गरुड झेप घेणे असते महत्त्वाची
तयारी कष्टाची व श्रमाची हवी 
उभा राहील गुढी स्व कर्तृत्वाची 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( मतभेद)

- मतभेद

नाही होत एकमत एका गोष्टीवर 
होतात सुरु मतभेद अन् वाद
मनोमिलन की मन दुरावा ?
असावा त्यासाठी सुसंवाद.

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( बाल संस्कार)

 बाल संस्कार 

नकळत रुजतात बालसंस्कार
बालमन संवेदनशीलतेचा कळस 
अनुकरणातून घडत जातात 
त्यांना नसतो कधीच आळस

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( झुला)

 - झुला 

झुल्यावर झुलते ललना हसरी 
तरंगतो हवेवर मुक्त केस संभार 
अलंकार शोभती वसनावरती
उजळून निघाले हे नील अंबर 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( पाऊस धारा)

... पाऊसधारा....

 अंगणी बरसल्या पाऊस धारा 
 शांत झाली जिवाची काहिली 
 तप्त भास्कर तप्त धरणी झाली 
 त्यावर वळीवाची सर वाहिली.

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( खंत मनाची)

 खंत मनाची 

जाळते जीवाला खंत मनाची 
व्यक्त होण्या धडपडत असते 
तमा नसावी कशाचीच कुणाला
नाहीतर जाळ्यात अलगद फसते

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

कविता ( मनाची घुसमट)

-- मनाची घुसमट

काय चाललयं सगळीकडे ,
मला समजेनासचं झालय .
घुसमट मनाची पाहून ,
मन अस्वस्थ झालय .

समजवायचं कुणी कुणाला ,
वाजलाय बाजा संस्काराचा.
नाती विसरलीत आता ,
झाला बाजार अनैतिकतेचा.

कुपमंडुकी वृत्तीने सगळे ,
वागतायत हो घरोघरी .
संस्कृती भारताची महान,
विस्कटली आहे दारोदारी .

सुरक्षिततेची नाही हमी ,
इथे कुणाच्या जीवाची .
रोजच होतात अत्याचार ,
दाद कुणाकडे मागायची ?

बोलेल त्याला गोळी आहे ,
विचार आता बंदी झालेत .
व्यक्त होण्या धडपडतयं मन
कित्येक जायबंदी झालेत .

विचार करुन थकलयं मन ,
विसावा शोधतयं सगळीकडे अराजकता माजलीय खूप ,
धावतंय अशांत मन चहुकडे

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

चारोळी ( मेघमाला)

.. मेघमाला
काळ्या करड्या रंगा मधुनी
पळू लागल्या त्या मेघमाला 
बरसत धावत नाचू लागल्या 
आसमंती धुंद सुवास आला 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( श्रम साफल्य)

:- श्रमसाफल्य 

यश सापडे अथक परिश्रमात 
श्रम साफल्याची मिळे अनुभूती 
घर्मबिंदू असती साक्ष तयाला 
समाधानाची अनुभूती ते देती

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर 
9881862530

चारोळी ( गोड )कंद

 - चित्र काव्य 

चारोळी लेखन 

गोड कंद जोडीने उगवला
हास्यवदने प्रेमालिंगन देती 
पाहुन किमया निसर्गाची 
जन सारे अचंबित होती.

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी (उत्सव सणांचा)

: उत्सव सणाचा

आनंदाने आज साजरा करू 
उत्सव सणांचा आला पहा दारी
रूढी परंपरा समजून घेऊ 
गणपती बाप्पाची आली वारी 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( मोरया)

 - मोरया

भालचंद्र मोरया नाव शोभते
माळावरी अन् शिरी विराजती
अर्धचंद्र हा विलसत राहतो
भक्तगण सारी भक्तीने गर्जती

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( बाप्पा निघाले घरी)

 बाप्पा निघाले घरी

 सेवा पाहून भक्तजनांची 
आनंदी गणेश अन मुषक स्वारी 
भक्ती भावाच्या प्रेमात रंगून 
नाचत बाप्पा निघाले घरी 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( गौरी येता घरी)

 : गौरी येता घरी..

 गौरी येता घरी मोद मनाला
पार्वती नंदन आनंदीत झाला
फळा फुलांच्या देठांनी सजली 
भाजी भाकर खाऊन तृप्त झाली

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( शिक्षक समाजाचा आरसा)

विषय- शिक्षक समाजाचा आरसा

भविष्यातील नागरिकाचा आहे 
शिक्षक समाजाचा आरसा 
 दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीचा 
चालवायला हवा आपल्याला वारसा 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

चारोळी (नव पिढी)

विषय -नव पिढी

 नवतंत्रज्ञानाची कास धरून
भरारी यशाची घेते नव पिढी 
ज्ञानमहासागरातून यशाकडे
उभारली जाईल कर्तृत्वाची गुढी

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

Thursday, 4 September 2025

हायकू

हायकू 

फुल/फुले

सुगंधालय 
भ्रमराचे गुंजन 
फुल पुजन 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

Sunday, 31 August 2025

परिचय

श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड , 
ता. शिरोळ , जिल्हा. कोल्हापूर.
फों नंबर 9881862530

मुख्याध्यापिका- न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ.कार्यरत

 हेरवाड हायस्कूल, हेरवाड,

माजी पर्यवेक्षिका- साने गुरुजी विद्यालय, कुरुंदवाड.
सहा.शिक्षिका- न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स कुरुंदवाड 
विषय - ईंग्रजी ,हिंदी, स्वविकास व कलारसास्वाद.

विद्यार्थीप्रिय शिक्षिका.

सदस्य - महिला दक्षता समिती , कुरुंदवाड पोलिस स्टेशन

माजी अध्यक्ष ,सल्लागार मंडळ- जानकी वृद्धाश्रम, घोसरवाड.

" भावतरंग " कवितासंग्रह प्रकाशित.

लेखिका - " समतेचे पुजारी - एस.एम.जोशी 

लेखिका- " चारित्र्य चक्रवर्ती शांतिसागर महाराज

चारोळीकार:  " शब्दचारोळी  " चारोळीसंग्रह 

कवयित्री: " अवनी- निसर्गातील माणिक मोती " कवितासंग्रह

प्रकृती-- हायकू संग्रह

आकाशवाणी सांगली केंद्रावरुन विविध विषयांवरील माहिती प्रसारण .

" साम टिव्ही " वर "सकाळ "       " तनिष्का " समन्वयक या नात्याने मुलाखत संपन्न.

विविध विषयांवर विविध वृत्तपत्रांतून व मासिकातून दिवाळी अंकातून लेखांचे, कवितांचे प्रकाशन .

माजी लायनेस अध्यक्षा व सचिव -कुरुंदवाड लायनेस क्लब तसेच रिजन कोऑर्डीनेटर , म्हणून कार्यरत व पुरस्कार प्राप्त.

सदस्य- लायन्स क्लब ऑफ,कुरुंदवाड.

विविध संस्थाकडून राज्यस्तरीय , जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त

सुबक साहित्य कलामंच,कोल्हापूर यांचा " आम्ही कवयित्री" पुरस्कार प्राप्त

काव्यप्रेमी शिक्षक मंच तर्फे 3/2/2019 चा     "काव्यप्रेमी आदर्श पुरस्कार " प्राप्त,नवापूर, नंदुरबार

स्टोरी मिरर डॉट कॉम तर्फे घेण्यात आलेल्या वूमन रायटर्स स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त 2019

चैतन्य शिक्षण समुह,अब्दुललाट चा साहित्य क्षेत्रातील " चैतन्य प्रेरणा पुरस्कार " प्राप्त.8 डिसेंबर 2019

काव्यस्पंदन साहित्य समुहातर्फे " काव्यस्पंदनी काव्योत्कर्ष पुरस्कार " प्राप्त.2020

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला,क्रीडा मंच,शाखा कोल्हापूर आयोजित विविध लेखन प्रकारात सहभागी होउन क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल सन्मानपत्र प्राप्त.

काव्यस्पंदन काव्यमंच तर्फे काव्यभूषण पुरस्कार प्राप्त.31/12/2020

श्रीमती माणिक कल्लाप्पा
नागावे छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान 2020 ने सन्मानित

लिखित,ध्वनिमुद्रित, चलचित्र व थेट प्रक्षेपण सादरीकरण रूपात साजरा झालेल्या अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला. या स्पर्धेमधील कथेसाठी छंदोगामात्य संमेलन साहित्यविष्कार,कविता सादरीकरणासाठी छंदोगामात्य संमेलन मनस्पर्शी मानकरी,अभंग सादरीकरणासाठी छंदोगामात्य संमेलन भक्तीलंकार मानकरी असे तीन पुरस्कार ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्र देउन गौरविण्यात आले.
 
न्युजपेपर गंगाधर साहित्य परिषदेमार्फत अवनी- निसर्गातील माणिक मोती या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार प्राप्त.27/2/2021

शिक्षण प्रसारक मंडळ,कुरुंदवाड यांच्या मार्फत महिला दिनानिमित्त  " कर्तबगार महिला " पुरस्कार प्राप्त 10/3/2021

निसर्गराजा ग्रुप,माणकापूर चा साहित्य रत्न प्रेरणा पुरस्कार प्राप्त.11/3/2021

शब्दसेतू साहित्य मंच तर्फे "शब्दसेतू साहित्य प्रवण" पुरस्कार प्राप्त 20/5/2021

ईनरव्हील क्लब जयसिंगपूर तर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड 2023-24

साहित्य सहयोग दीपावली व मासिक इंद्रधनुष्य यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या स्वर्गीय आमदार डॉक्टर सा.रे. पाटील स्मृती प्रित्यर्थ अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धा यामध्ये उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त 2024

दक्षिण भारत जैन सभेच्या जैन इतिहास व परिषदच्या सदस्य पदी नेमणूक- 2025-26

राष्ट्रसेवादल सैनिक

विविध ठिकाणी जाऊन विविध विषयांवर व्याख्यान देणे .

ऑनलाईन विविध साहित्य प्रकारच्या स्पर्धेत स्पर्धक, सहभागी व क्रमांक प्राप्त.तसेच परीक्षणही केले आहे., प्रमाणपत्रे प्राप्त

पाचवे संवाद साहित्य संमेलनामध्ये सलग दोन वर्षे निमंत्रीत कवयित्री म्हणून सहभाग.2018/19

ग्रामीण साहित्य संमेलन निमशिरगांव येथे काव्यवाचन 2018

आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील.  साहित्य संमेलनात काव्यवाचन 2018

शब्दगंध साहित्य मंच ,शिरोळ व दीनबंधू दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलन, शिरोळ येथे काव्यवाचन. 1/2/2019

काव्यप्रेमी शिक्षक मंचाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई जिल्हा आयोजित कांदिवली येथील कवी संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित 3/6/2019

24 वे मराठी जैन साहित्य संमेलन, शिरढोण येथे काव्यसंमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग व काव्यवाचन.8/6/2019 

अभिजात मराठी साहित्य परीषदेमार्फत माय मराठी या विषयावर घेण्यात आलेल्या काव्यलेखन स्पर्धेत 1076 कवितांमधून 101 कवितांची निवड महासंग्रहासाठी करण्यात आली त्यात माय मराठी या कवितेचा समावेश.त्यानिमित्ताने11/12/2018 ला अमरावती येथे सत्कार करण्यात आला. 

14 फेब्रुवारी2019 रोजी भाग्यलक्ष्मी ग्रामीण महिला पतसंस्थेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित- व्यक्तीमत्व विकास व संस्कार या विषयावर व्याख्यान दिले.

शुक्रवार 3 जानेवारी 2020 माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कुमार विद्यामंदिर, बुबनाळ आयोजित माता पालक मेळाव्यात  मार्गदर्शन 

शनिवार 4/1/2020 रोजी काव्यकट्टा महिला समुह,महाराष्ट्र आयोजित साऊ मानवंदना संमेलन, निगडी,पुणे येथे निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग

विद्यार्थी विकास प्रबोधिनी अब्दुल लाट संचलित बालोद्यान येथे ज्ञानदीप प्रकल्प अंतर्गत घेण्यात आलेल्या " साहित्य लेखन कार्यशाळेत " " लेखक आपल्या भेटीला " उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.रविवार दि.12/1/2020

 गौरवाड येथे श्री.दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुरुंदवाड च्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिरात संस्कार व व्यक्तीमत्व या विषयावर मार्गदर्शन.रविवार दि.19/1/2020

कलाश्री.डॉ.बा.ग.पवार आलास-बुबनाळ विद्यालय,आलास येथे अश्मी इंडिया संस्थेमार्फत सॅनिटरी नॅपकिन वाटप,मासिक पाळी व्यवस्थापन मार्गदर्शन, हळदी-कुंकू समारंभ, व माता-पालक मेळाव्यात मार्गदर्शन .
मंगळवार दिनांक 4/2/2020 

कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय,इंगळी.व अटल प्रतिष्ठाण,हुपरी आयोजित पहिले मराठी ग्रामीण साहित्य संमेलन रविवार दि.23/2/2020 रोजी श्री.अंबाबाई मंदिर हॉल ,हुपरी येथे संपन्न झाले. यावेळी कवयित्री ऋतुजा माने,मिरज यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन घेण्यात आले. त्यावेळी  " राजे पुन्हा याल का ? " ही स्वरचित कविता सादर केली.

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्यु. कॉलेज , इचलकरंजी येथे 27 फेब्रुवारी 2020 रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी " मराठी दिन " कार्यक्रमात मराठी भाषेबद्दल व्याख्यान देण्याकरीता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित.

माई साहित्य कला अकादमी जयसिंगपूर, येथे नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या  काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षक म्हणून उपस्थित.गुरुवार दि. 27/2/2020

कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय,इंगळी तर्फे भरवलेल्या साहित्य संमेलनात काव्यवाचन सत्रात अध्यक्ष नोव्हेंबर 2020 

सातवे संवाद ग्रामीण साहित्य संमेलन, शिरढोण येथील काव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड.7/3/2021

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मजरेवाडी येथे महिलांना मार्गदर्शन - महिला सबलीकरण.8/3/2021 

इंद्रधनुष्य मासिक फेब्रुवारी 2019 मध्ये 
" मनोनिग्रहाची भरारी " ही कथा प्रकशित
व सप्टेंबरच्या अंकात " कोप निसर्गाचा " कविता प्रकाशित.जुलै,ऑगस्ट च्या अंकात "  महिमा वर्षाऋतुचा " लेख प्रकाशित.जानेवारी 2021 च्या अंकात " संवाद झाला मुका " लेख प्रकाशित.

संपादक चंद्रकांत कोकीतकर यांच्या ताम्रकाठ दिवाळी अंक 2019 मध्ये " तिच्या घरी सुखी राहूदे " कथा प्रकाशित.

कृषी उत्कर्ष दर्पण मासिक ,नोव्हेंबर2020 च्या अंकात 
" आजची युवापिढी व कृषी व्यवसाय " लेख प्रकाशित.

साहित्य दर्पण दिवाळी विशेषांक 10 नोव्हेंबर 2020 च्या अंकात " सण आनंदाचा " कविता प्रकाशित.

शब्दशिवार दिवाळी अंक 2020 मध्ये " देव नाही देवालयी " अष्टाक्षरी कविता प्रकाशित.

नवरत्न दिवाळी अंक 2020 मध्ये " अंत एका ध्यासपर्वाचा " लेख प्रकाशित.

फंटुश दिपावली बाल विशेषांक 2020 मध्ये  
" प्राण्यांची सभा " बालकविता प्रकाशित.

सडेतोड दिपावली विशेषांकात लेख प्रसिद्ध 

    आनंदवन व हेमलकसा येथे भेट. सप्टेंबर 2005

Tuesday, 26 August 2025

चित्र काव्य (सुंदर बालपण )

शिर्षक - सुंदर बालपण

वेळ आणि सुंदर बालपण
हरवल्यावरच छान वाटतात 
गेल्यावर शोधतो आनंदी क्षण
पण ते फार दूर गेलेले असतात 

पावसाळ्यातील धमाल मस्ती 
दारातून वाहती ओहळ छान 
प्रवाहीत जलात कागदी नावा
मार्गस्थ होतात गात गान

उतरती छपरे कौलारू छत
शोभून दिसतो विटकरी रंग
हिरवाईच्या कुशीतला गारवा
समाधानात होती सारे दंग 

पागोळ्यावरुन टपटपते पाणी 
पाट वाहती झुळझुळ दारी
छोटुकल्यांचे खेळ बालपणीचे 
असते त्यांची मौजच न्यारी

आनंदाचे भरते ओसंडते 
भावा-बहिणींचे प्रेम दिसते 
भिजल्या अंगाची ना तमा तयास
प्रसंगाची या आज गरज भासते

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Tuesday, 12 August 2025

बदलते कौटुंबिक नाते

बदलते कौटुंबिक नातेसंबंध 

कुटुंब म्हटलं की डोळ्यासमोर येतं एक हसरं,खेळतं प्रेमाने ओसंडून वाहणारं एक घर. कुटुंब व्यवस्था ही मानवी इतिहासाच्या सुरुवातीलाच दिसून येते. अनेक वर्षांपासून मानव जेव्हा समूहामध्ये राहू लागला तेव्हापासून कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आली. एकत्र कुटुंब पद्धती ही भारतीय संस्कृतीची ओळखच आहे. पूर्वीच्या काळी अनेक कुटुंब एकत्र व गुण्यागोविंदाने राहत. त्यावेळी एकच करता पुरुष व त्यावर अवलंबून असणारे सर्वजण त्याचा आदर करत व त्याच्या सांगण्याप्रमाणे गुण्यागोविंदाने एकत्र राहत. पूर्वीच्या काळी फारशा सुख- सुविधा नव्हत्या.लाईट, पाणी, अन्नपदार्थ व इतर भौतिक सुविधांची वाणवा होती. तरीसुद्धा सर्वजण एकाच छताखाली अत्यंत सुखी समाधानाने राहत होते. सकाळी लवकर उठणे,सडा संमार्जन करणे,एकत्रित बसून सर्वजण जेवण घेणे, संध्याकाळी परत लहान मुलांच्या कडून हातपाय धुवून झाल्यावर शुभं करोति व देवाचे नामस्मरण करून घेतले जायचे व संध्याकाळी सर्वजण एकत्र बसून जेवत व गप्पा मारून झाल्यानंतर लवकर झोपी जात. व सकाळी लवकर उठत.सर्वांमध्ये प्रेम,जिव्हाळा होता. कुणाच्याही मनामध्ये कुणाच्याबद्दल अनास्था नव्हती. पण काळ बदलला. आधुनिकतेची हवा सर्वत्र खेळू लागली. संगणकाचे युग आले, आणि अशा या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये टीव्ही, मोबाईल यासारख्या चैनीच्या वस्तुंनी प्रवेश केला. नोकरीसाठी लोक बाहेरगावी जाऊ लागले आणि ही एकत्र कुटुंब पद्धती व कौटुंबिक नात्यांमध्ये बदल घडून येऊ लागले. पूर्वी एकत्र येणारे लोक आता मोबाईल मुळे लांब जाऊ लागले.प्रत्येक जण आपापल्या मोबाईल मध्ये डोकावू लागला व एकाच घरात असून सुद्धा एकमेकांच्यातला संवाद कमी झाला. त्याचबरोबर प्रेम आपुलकी जीव्हाळाही कमी झाला. शिक्षणाने माणूस सुशिक्षित झाला पण कुटुंबापासून बाजूला झाला.

भारतीय समाज हा त्यातील कुटुंब व्यवस्थेमुळे संपूर्ण जगात ओळखला जातो. कारण भारतातील कुटुंब व्यवस्था ही त्यामध्ये असलेल्या व्यक्तींच्या नात्यामधून, त्यांच्या प्रेमामधून,त्यांनी एकमेकांना केलेल्या सहकार्यातून पुढे जात असतो. कुटुंब पद्धती म्हणजे त्यातील असलेल्या व्यक्ती ज्यामध्ये आई-वडील, काका-काकू, आजी-आजोबा, आत्या, मावशी , माम- मामी व घरातील सर्व मुले-मुली होय. हे सर्वजण गुण्यागोविंदाने एकाच घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब पद्धती. घरामध्ये असलेले आजी आजोबा संस्कार केंद्र म्हणून ओळखले जातात.आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींच्यावर त्याचबरोबर घरातील लहान मुलांच्यावर संस्कार करण्याचे काम त्यांच्या हातून आपसूकच होत असते. यासाठी कुठल्या शिकवणीची गरज नसते. घरातील  वातावरण, त्यांचे एकमेकांशी असलेले नाते पाहून आपोआपच घरातील लहान मुले शिकत असतात.याचाच परिपाक म्हणजे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती गुण्यागोविंदाने नांदत असे. 

आज शिक्षणाची गंगा दारोदारी वाहत आहे त्याचाच फायदा घेऊन घरातील सर्व व्यक्ती सुशिक्षित झाल्या व नोकरीला लागल्या. नोकरी करत असताना बऱ्याच वेळेला परगावी जावे लागते. येण्या जाण्याचा त्रास होतो त्या वेळेला नोकरीच्या गावीच राहू लागतात. आई वडील व त्यांची मुले एवढं छोटं कुटुंब तयार होतं. त्यांचं जग स्वतःभोवतीच फिरत राहतं. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहिल्यामुळे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, एकमेकांच्या अडीअडचणी सोडवणं, एकमेकाला समजून घेणे, स्वतःपेक्षा दुसऱ्याचाच विचार करणं हे घडत असतं. पण आता या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबातील नातेसंबंधात सुद्धा फार मोठा बदल होत आहे. यामध्ये नातेसंबंधातील प्रेमाची व्यापकता कमी होत आहे.सुट्टीच्या कालावधीमध्ये, सण समारंभाला ते आपल्या घरी परत येतात. व थोड्या कालावधीसाठी राहून परत आपल्या गावी निघून जातात. पण यामध्ये तो जिव्हाळा दिसत नाही जो खूप वर्ष एकत्र एकाच कुटुंबात राहून मनामध्ये तयार झालेला असतो. शहराची ओढ लागलेल्या मुलांना ग्रामीण भागात राहायला नकोसे वाटते. त्याचबरोबर शहरात मन रमवण्यासाठी,मनोरंजनासाठी अनेक सुख-सुविधांची साधने तयार असतात ते त्यांना ग्रामीण भागामध्ये मिळत नसल्यामुळे घरातील व्यक्तींच्या पेक्षा त्यांना या साधनांचीच ओढ लागलेली असते. पण या साधनांच्या मध्ये प्रेम, जिव्हाळा,भावना यांचा लवलेशही नसतो.त्यामुळे ही मुले कृत्रिम साधनांच्यामध्ये गुरफटून जातात. कारण त्यांच्यावर संस्कार करणारे आजी-आजोबा त्यांच्याजवळ नसतात. नोकरी निमित्त आई व बाबा दोघेही बाहेर जात असतात अशा वेळेला या मुलांना घरामधील व्यक्तींचा आधार असतो त्या वेळेला आजी-आजोबा किंवा घरातील इतर व्यक्ती त्यांचा सांभाळ करतात. या व्यक्तींचा मुलांना आधार वाटत असतो व सुरक्षित तिची भावना त्यांच्या मनामध्ये असते. परंतु ही नाती आता आजी आजोबांच्या बरोबर दुरापास्त होत चाललेली दिसतात.

नाती हरवलेली आजची पिढी मोबाईलच्या,संगणकाच्या आभासी दुनियेत रमत आहेत. मुलांच्या मनामध्ये असलेली प्रेमाची, स्नेहाची,सहानुभूतीची भूक पालक भागवू शकत नाहीत त्यामुळे मुले आभासी जगातील मित्र- मैत्रिणीच्या मध्ये नातेसंबंध शोधत आहेत. व्हाट्सअप,फेसबुक, इंस्टाग्राम यावरील मित्र-मैत्रिणी हेच त्यांचे जग झालेले आहे. त्यातच ते रमत आहेत. इंटरनेटमुळे सारे जग जरी जवळ आले तरी जवळच्या व्यक्ती दूर जात आहेत. कुटुंबातील एकमेकांच्या बरोबर असलेले नातेसंबंध यामध्ये फार मोठी तफावत होत आहे. कुटुंबातील व्यक्तींच्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे त्यांच्यामधील असलेला जिवंत प्रेमाचा झरा हा कुठेतरी आटताना दिसत आहे. घरामध्ये  शेजारी असलेल्या व्यक्तींशी बोलायला सवड नसते पण सोशल मीडियावर तासंतास घालवून मनाला समाधान मिळवणारेच आता जास्त दिसत आहेत. आता तर असे चित्र दिसत आहे की मुलांना आपले आई-वडील भाऊ-बहीण यांचाही त्रास होत आहे कारण ते सोशल मीडिया वापरत करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या गेममध्ये मुले अडकत आहेत व त्यांना यापासून दूर करणारे,नकार देणारे त्यांचे पालक त्यांची भावंडही त्यांना नको आहेत. प्रसंगी आपल्या आई-वडिलांचा, नातेवाईकांचा खून करण्यास ही मागेपुढे बघत नाहीत.यासाठी सर्वांनी वेळीच सावध झाले पाहिजे. कृत्रिम साधनांच्या आहारी आपल्या मुलांना घालवण्याऐवजी जिवंत माणसांना एकत्र आणणारी कुटुंब व्यवस्था व त्यातील नातेसंबंध अतिशय मौल्यवान आहेत. त्याचे जतन करायला हवे.

कौटुंबिक व्यवस्था एक दिसत असली तरी त्यांच्यातील नातेसंबंधांमध्ये आता थोडी फार तफावत दिसून येत आहे. यामध्ये स्त्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पूर्वी स्त्रिया नोकरी न करता घरात राहून घरच्यांचे नातेसंबंध सांभाळायच्या पण यात एक चूक होती की तिला सर्वात गृहीत धरले जायचे.कोणत्याही प्रकारचा मानसन्मान दिला जात नसे. त्यामुळे जस जसा समाज सुधारत गेला, वैचारिक क्रांती होत गेली तस तशा स्त्रिया शिकून नोकरी करू लागल्या. नोकरी करत असताना बहुत करून स्त्रिया या घरचे काम करून नोकरी सुद्धा व्यवस्थित सांभाळत असतात. त्यावेळेला घरच्यांचे नातेसंबंध जोडताना, टिकवताना त्यांना नाकी नऊ येतात पण त्या यशस्वीरित्या हे सर्व पार करत असतात. पण त्यातही अशा काही स्त्रिया आहेत ज्या केवळ अर्थाजनासाठी बाहेर पडलेल्या असतात. त्यांना त्यांचे अस्तित्व टिकवायचे असते. त्यांच्या मनामध्ये स्वत्वाची भावना उदयास आलेली असते आणि अशा वेळेला मग त्या मी नोकरी करते म्हणजे मी कुणीतरी वेगळी आहे असे समजल्यामुळे घरातील लोकांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची अढी निर्माण झालेली असते किंवा एक अहंगंड निर्माण झालेला असतो त्यामुळे मी घरातील सर्व कामे का करू? अशा प्रकारचा एक दुजाभाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो आणि अशा वेळेला मी व माझे कुटुंब या संकुचित वृत्तीचे विचार मनामध्ये पेरले जातात. घरातील इतर लोक, त्यांच्याबद्दलचे नातेसंबंध याबद्दल तिच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची ओढ राहत नाही. त्यामुळे अशा काही स्त्रियांच्या मुळे नोकरी करणाऱ्या सर्वच स्त्रियांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा गैरसमज निर्माण झालेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. मला संकुचित विचार करणाऱ्या व नोकरी करणाऱ्या स्त्रियांना सांगायचे आहे. पैसा हा सर्वस्व नाही कारण शेवटी आपण संकटामध्ये सापडतो त्यावेळेला पैशाबरोबर नातेसंबंधातील व्यक्ती, घरातील व्यक्तीच आपल्याला मदत करतात. आपल्याला त्यांचीच गरज भासते. नुसता पैसा असून चालत नाही. 

अलीकडे अशिक्षित लोकांच्या मानाने सुशिक्षित लोकांच्या मधील घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. एकमेकाला समजून घेण्याची भावना सध्या कोणामध्ये दिसत नाही. घरातील इतर व्यक्ती बाहेरून आलेल्या मुलीला समजून घेण्यास कमी पडत आहेत. काही ठिकाणी हे चित्र जरी उलटे दिसत असले तरी हे प्रमाण कमी आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या घरच्या लोकांच्या अपेक्षा फार आहेत. तिने नोकरीही करावी व घरातील कामेही करावीत अशा अवाजवी अपेक्षा उंचावल्यामुळे घरामध्ये कलह निर्माण होतो. यातून एकमेकांच्या बरोबरची भांडणे  विकोपाला जातात व शेवटी याचा परिणाम घटस्फोटामध्ये होतो. पाच- पाच वर्षे संसार करून काही सुशिक्षित महाभागांना पाच वर्षे खाऊन पिऊन सुद्धा असा साक्षात्कार होतो की बायको ,सून स्वयंपाक करत नाही एवढ्या छोट्या कारणाने घटस्फोट घेणारे सुशिक्षित व त्यांच्या घरचे अडाणी सासू-सासरे समाजामध्ये दिसतात. हे कुठले सुशिक्षितपणाचे लक्षण आहे? का पैसे मिळवण्यासाठी दुसरी बायको करून आणणे असा प्रकार असावा? कायदा हा स्त्रीच्या बाजूने आहे असे कितीही म्हटले तरी सहजासहजी कोणत्याही स्त्रीला न्याय मिळत नाही असे चित्र दिसत आहे. त्याचप्रमाणे आजची विभक्त कुटुंब पद्धती याला कारणीभूत आहे .कारण छोटे कुटुंब असल्यामुळे मी व माझ्या स्वतःभोवती सर्वांचे जग फिरत आहे त्यामुळे एकमेकांना समजून घेणे दिसत नाही. काहींचा एगो इतका मोठा असतो की समोरच्याची खरी बाजू दिसत असून सुद्धा माघार घेण्यास ते तयार नसतात. अशावेळी कुटुंबांमधील नातेसंबंधातील भावनिक दुरावा वाढतच जातो. यामध्ये वेळ,पैसा, नातेसंबंधातील प्रेम हे सगळेच खर्ची पडते. नोकरीसाठी बाहेर पडत असताना घरामधील कामाची आवराआवर करून बाहेर पडल्यानंतर समाजामधील लोकांशी टक्कर देत नोकरीच्या ठिकाणी जाण्यापर्यंतची धावपळ, नोकरीच्या ठिकाणी असलेले कामाचा ताण यामुळे ताण-तणाव वाढतो व मानसिक स्थिती बिघडली जाते. अशावेळी सर्वांनीच एकमेकाला समजावून घेतले पाहिजे. एकमेकांचा नाव कमी केला पाहिजे.अशावेळी हुकूमशाही काही कामाची नाही.

तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात वावरत असताना नव्या पिढीचे विचार व जुन्या पिढीचे विचार यामध्ये तफावत दिसून येत आहे. नवी पिढी नव्या विचारांप्रमाणे वागत असते पण ते जुन्या पिढीला पटत नसते. हळू हळू  नातेसंबंधात तडे जायला सुरुवात होते. अशावेळी जुन्या व नव्या पिढीतील व्यक्तींनी एकमेकाला समजावून घेऊन कुठेतरी सुवर्णमध्य काढणे आवश्यक आहे. अशावेळी सर्वांनी आपला अहंभाव व माझेच सर्वांनी ऐकले पाहिजे, मीच बरोबर आहे ही भावना थोडीशी बाजूला ठेवून आपल्या कुटुंबाला, कुटुंबातील नातेसंबंधाला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण शेवटी बाहेरच्या लोकांच्या पेक्षा आपल्या घरातील जवळचे लोकच आपल्याला मदत करत असतात याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. त्याचप्रमाणे मोबाईलचा अतिवापर हा सुद्धा कुटुंबातील नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करणारा, कुटुंबातील व्यक्तींना एकमेकापासून दूर करणारा घटक बनत चाललेला आहे. ज्यावेळी मोबाईल नव्हता त्या वेळेला सर्वजण एकमेकांबरोबर समोरासमोर बसून बोलत होते. एकमेकांच्या भावभावना समजून घेत होते. एकमेकाच्या दुःखांचा विचार करत होते. ते दुःख कमी करण्याचा सक्रिय प्रयत्न करत होते. एकमेकांबद्दलचे प्रेम एकमेकांच्या मनामध्ये होतं.पण आज सर्वजण या व्हर्च्यूअल जगातच वावरत आहेत त्यामुळे भावनांना आता कुठेच स्थान दिसत नाही.अगदी लहान मुलांच्या पासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वजण मोबाईल मध्ये गुंग आहेत. याचा एक दुष्परिणाम असा होतो की आपला मेंदू विचार करणे थांबवतो. त्यामुळे मनातील भावना  गोठल्या जातात. भावनांचा निचरा कुठेही न झाल्यामुळे मग व्यक्ती चिडचिड होते. दुसरे कोणीही जवळ नको असे वाटते.ह्या मोबाईलच्या लहरी पासून मेंदूवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे या मोबाईलच्या आहारी किती जायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. या आभासी जगात लाखो मित्र-मैत्रिणी असले तरीसुद्धा प्रत्यक्ष जेव्हा एखादी व्यक्ती संकटात सापडते त्यावेळेला घरातील जवळच्या व्यक्तीशिवाय पर्यायच नसतो. आपल्यातील नातेसंबंध हेच आपले खरे संबंधित आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.

नातेसंबंधातील दुराव्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचे कारण म्हणजे सुसंवादाचा अभाव होय. एकमेकाबद्दल एकमेकांच्या भावना समजून घेऊन बोलण्याचे प्रमाण अत्यंत कमी झालेले आहे. सर्वांनी एकमेकांच्या भावना, विचार ऐकून घेणे व एकमेकांच्या भावनांची कदर करणे  गरजेचे आहे. एकमेकांच्या अनुभवांचा विचार करणे गरजेचे आहे. काहीजणांना स्वतःचा हक्क गाजवण्यासाठी दुसऱ्याचे काय म्हणणे आहे ते ऐकून न घेता स्वतःचेच म्हणणे सर्वांनी ऐकले पाहिजे असे वाटत असते.अशामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. जर घर टिकवायचे असेल, घरातील नातेसंबंध टिकवायचे असतील, दुरावा दूर करायचा असेल तर प्रत्येकाने  प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे व योग्य तो आदर प्रत्येकाला दिला पाहिजे. एकमेकाला भावनिक आधार देणे,त्यांच्या चुका समजून घेऊन चर्चा करणे गरजेचे आहे. मुले मोठी झाली की त्यांच्या अशा अपेक्षा वाढत असतात अशावेळी त्यांना त्यांच्या पुढील परिणामाला तेच जबाबदार आहेत याची जाणीव देऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपवणे गरजेचे असते. त्यांच्यावर अधिकार न गाजवता त्यांचे सोबती बनून त्यांना योग्य तो सल्ला देणे गरजेचे असते. अशाने त्यांच्या मनावरचा ताण कमी होतो व ते रिलॅक्स होतात. कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या बरोबर ओळख व नातेसंबंध दृढ करण्यासाठी महिन्यातून, वर्षातून एखादा कार्यक्रम ठेवणे गरजेचे असते ज्यामुळे दूर राहिलेले आपले नातेवाईक हे जवळ येतील व एकमेकांना समजून घेण्याची एक संधी मिळेल व नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याच्या ऐवजी त्यामध्ये एकसंधता निर्माण होण्यास मदत होते.

आधुनिकतेचा स्वीकार करत असताना चालत आलेल्या संस्काराच्या परंपरा आपण कधीही विसरता कामा नये. बदललेली कुटुंब पद्धती व त्यातील बदलत चाललेले नातेसंबंध याचा विचार केला असता, सर्वांच्यात सुसंवाद होणे गरजेचे आहे.यासाठी सोशल मीडियाचा कायम वापर न करता प्रत्यक्ष एकमेकांच्या भावना एकमेकांना भेटून सांगितल्या पाहिजेत.यामध्ये जो जिव्हाळा आपुलकी असणार आहे ती सोशल मीडियाचा वापर करून देण्यात येणाऱ्या कृत्रिम निरोपामध्ये नाही. कुटुंबातील सर्व व्यक्ती जर एकत्र राहत असतील तर येणाऱ्या पिढीला त्यांच्यामधील असलेले नातेसंबंध लक्षात येतील अन्यथा येणाऱ्या पिढीला एकत्र कुटुंब पद्धती व एकमेकांमधील नातीसुद्धा समजावून सांगणे अवघड होऊन जाईल. यासाठी आई-वडिलांना एक आदर्श पिता व एक आदर्श माता बनने आवश्यक आहे. संस्काराचे केंद्र असलेल्या आजी- आजोबा यांच्या सहवासात आपल्या मुलांना ठेवले पाहिजे. आधुनिकतेचा वापर स्वैराचारासाठी न करता स्वयं विकासासाठी केला पाहिजे. पाश्चात्य संस्कृती व भारतीय संस्कृती यामधील फरक ओळखता आले पाहिजे. सोशल मीडियावर चालत आलेला चंगळवादाचा,माणुसकीला विसरायला लावणारा व कुटुंब संस्थेला सुरुंग लावून उद्ध्वस्त करणारा दृष्टिकोन पूर्णपणे दुर्लक्षित केला पाहिजे.
 संस्काराच्या अभावामुळे संकुचित व आपमतलबीवृत्ती वाढत आहे त्याचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. तरच बदलते नातेसंबंध त्यातील दुरावा कमी होईल.

लेखिका 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा.कोल्हापूर
९८८१८६२५३०

Monday, 30 June 2025

मिरची मोर (चित्रकाव्य)

विषय- चित्रकाव्य

शिर्षक - मिरची मोर

कलाकृती सुंदर साकारली 
मनाला सहज मोहवून गेली 
हिरवा मिरची मोर पाहता 
आजीच्या गाली कळी खुलली 

गोलाकार मोर साकारला 
मिरच्यामधून कौशल्य साकारले 
कल्पना आजीची मना भावली 
मांडणीतून तिच्या ते उतरले 

सुबकता पाहता मन आनंदले 
तिखट मिरची लोचनी सुखावे 
पिसाऱ्यासह अंग चितारले 
पाहताना वाटे बघतच रहावे 

शिल्लक दिसे डालग्यात मिरची
बाजूला ढीग दिसतो कशाचा?
लाल तिखट दिसते वाटीत 
तो कुठे अन् कसा वापरायचा? 

शेजारीच ठेवलयं पाणी प्यायला 
पेरू ठेवलेत तोंडी लावायला 
लवकर लवकर सारे या 
कौतुक आजीचे करायला

संदेश यातून एकच मिळतो 
नकारात्मकता घालवायची
तिखट सौंदर्य साकारून 
सकारात्मकता मिळवायची

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड. जिल्हा कोल्हापूर 
९८८१८६२५३०

Friday, 13 June 2025

जागतिक पितृ दिवस

जागतिक पितृ दिवस 

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे वचन आपण नेहमीच ऐकत असतो. यातून आपल्या आईची महती व्यक्त केली जाते. आई आणि वडील हे दोघेही घराचा, कुटुंबाचा आधारस्तंभ असतात.जसं आईविना भिकारी असं म्हटलं जातं तसंच वडिलांच्या विना हे जग त्याच्या कुटुंबासाठी अत्यंत दुःखदायी, वेदनादायी असते हे ज्याला वडील नाहीत त्याला जाणवते. बाबा या शब्दातच फार मोठा आधार आहे. यासाठीच दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जागतिक पितृ दिन हा साजरा केला जातो. 
हा दिवस साजरा करण्या पाठीमागचा उद्देश हाच की आपल्या वडिलांच्या प्रति आपली प्रेमाची भावना व्यक्त करणे.त्यासाठी आपण आपल्या वडिलांना काहीतरी चांगले गिफ्ट देणे किंवा त्यांना जे काही चांगले वाटेल त्या पद्धतीने कृती केली पाहिजे, जेणेकरून आपल्या वडिलांना आनंद, समाधान वाटेल. हे फक्त एका दिवशीच करायचे असे नाही पण प्रतिनिधीक स्वरूपामध्ये आपण हा दिवस साजरा करत असतो. ज्या घरामध्ये वडील असतात त्या घरामध्ये नेहमी एक प्रकारचे संरक्षीत वातावरण असते. काहीही झाले,कितीही संकटे आली तर आपले वडील  त्यापासून आपली मुक्तता करतील हा एक आंतरिक आत्मविश्वास सर्वांच्या मनामध्ये असतो. ज्या घरामध्ये वडील असतील त्या घराकडे वाकडी नजर करून बघण्याची ही कोणाची हिंमत नसते. कारण त्यांना माहीत असते की वडील हे त्या घरची संरक्षक भिंत असतात, कर्ते पुरुष असतात. ते त्या घरच्या लोकांच्या डोक्यावरचे एक आधाराचे छप्पर असतात. लहान लहान संकटासाठी आपण आपल्या आईचा आधार घेऊन त्यातून बाहेर पडू शकतो पण जेव्हा मोठे संकट येते त्यावेळेला बाबांचीच म्हणजे आपल्या वडिलांचीच आठवण येते व त्यांची गरज भासते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. वडील हे असे व्यक्तिमत्व आहे की जे स्वतः कितीही दुःखी असले तरीही ते दुःख आपल्या कुटुंबासमोर ते कधीही व्यक्त करत नाहीत कारण त्यांना माहिती असते की आपण जर खचलो,दु:खी झालो तर आपल्यावर अवलंबून असणारे हे सर्वजण कुणाकडे पाहतील? त्यामुळे जेव्हा वडील दुःखी असतात तेव्हा ते बाजूला जाऊन रडतील, आपले दुःख प्रकट करतील पण कोणासमोर आपली हतबलता व्यक्त करत नाहीत. यासाठी आपण आपल्या वडिलांना समजून घेतले पाहिजे त्यांच्या भावभावनांचा विचार केला पाहिजे. त्यांच्या चेहऱ्यावर पाहून त्यांच्या मनामध्ये काय चालले आहे हे समजून घेतले पाहिजे. यासाठी आपलं आपल्या वडिलांच्या बरोबरच नातं अत्यंत घनिष्ठ आणि जवळच पाहिजे. हे केव्हा घडेल? जेव्हा आपण आपल्या वडिलांच्या बद्दल आपल्या मनामध्ये एक प्रकारची सन्मानाची, आदराची भावना ठेवू तेव्हाच हे घडेल. बाप कितीही गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे आपल्यावर अवलंबून असणाऱ्या आपल्या कुटुंबासाठी ते सतत झटत असतात. त्यांच्या भल्याचा विचार करत असतात व आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही कशी पुढे जाईल त्याला कसा समाजामध्ये मानसन्मान मिळेल हाच विचार त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी घोळत असतो. आज समाजामध्ये आपण पाहतो की वडिलांच्या विना अनेक कुटुंबे आपले जीवन व्यतीत करत असतात.कुटुंबातील स्त्री ही सक्षम असेल तर ते कुटुंब व त्या कुटुंबातील व्यक्ती, मुले ही निर्धास्तपणे राहू शकतात पण जर त्या घरातील स्त्रीकडे कोणतेही काम नसेल, पैसा मिळवण्याचे साधन नसेल, ती कुठेही नोकरी करत नसेल तर त्यांचे हाल त्यांनाच माहीत, कारण त्यांना प्रत्येक लहान सहान गोष्टींवर दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते यावेळी त्या स्त्रीला किंवा तिच्या मुलांना तिच्या पतीची किंवा त्या मुलांना आपल्या बाबांची पावलोपावली आठवण येत असते.
लहान मुल सुद्धा प्रत्येक पुरुषांमध्ये आपल्या बाबाला पाहत असते. व त्यांच्याकडे झेपावून ते आपल्याला कधी उचलून घेतील आपल्याला फिरवून आणतील अशी एक भाबडी अशा त्याच्या मनामध्ये दिसत असते. लहानपणापासूनच नकळत मुलांच्या मनावर बाबा बद्दलची एक आधाराची भावना नकळत तयार होत असते.
मला माझ्या बाबांच्या बद्दल खूप अभिमान आहे. माझे वडील श्री.भूपाल तातोबा दिवटे हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे जीवन कोणालाही आदर्श घेण्यासारखेच आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले व माझ्या आईला म्हणजे पुष्पा भूपाल दिवटे हिलाही त्यांनी लग्नानंतर शिक्षण देऊन नोकरी मिळवून दिली. तिला तिच्या पायावर उभे केले. घरातील विरोधाचा सामना करत त्यांनी हे सर्व पूर्ण केले. राष्ट्रसेवा दलाचे संस्कार त्यांच्यावर असल्यामुळे त्यांना स्त्री शिक्षणाचे महत्त्व माहिती होते. त्याप्रमाणे त्यांनी दुसऱ्यांना उपदेश करण्यापेक्षा स्वतःकृती केली. घरामध्ये समानतेची वागणूक दिली. आम्हा मुलांच्यावर त्यांचा आदरयुक्त धाक होता. अभ्यासाच्या बाबतीत मात्र त्यांनी कधीही आमच्यावर दया दाखवली नाही. त्यामुळेच आज आम्ही भावंडे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. पेशाने शिक्षक असल्यामुळे त्यांना आपल्या विद्यार्थ्यांच्या बद्दल अति आत्मीयता होती. त्यांचा सर्व वेळ हा शाळेतील विद्यार्थ्यांच्या समवेतच जायचा. आपला विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये नेहमीच चमकत राहिला पाहिजे ही त्यांची उर्मी त्यांना कधीही स्वस्त बसू देत नव्हती. शाळा सुटायच्या आधी व शाळा सुटल्यानंतरही ते स्कॉलरशिपचे जादा तास घेत असत. त्यांची क** शिस्त व शिक्षणावरील प्रेम व विद्यार्थ्यांच्या बद्दलची मनामधली अस्मिता यामुळेच कित्येक विद्यार्थी त्यांचे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यशस्वी झालेले आहेत व आज ते मोठमोठ्या मुद्द्यावर कार्यरत आहेत. त्यांची जिथे जिथे बदली होईल तिथे त्यांनी त्या शाळेचे नंदनवनच केलेले आहे. शैक्षणिक कार्याबरोबर समाजकार्याचीही त्यांना आवड होती. शिक्षक संघटनेचे कार्यही अत्यंत जोमाने करत होते. नरसोबावाडी च्या श्री गुरुदेव दत्त यांच्यावर त्यांची प्रगाढ  श्रद्धा असल्यामुळे त्यांनी दत्तगुरुंवर लिखाण केले आहे. त्यांना वाचनाची खूप आवड असल्यामुळे त्यांनी खूप वाचन केले. याचाच परिणाम त्यांची लेखणीही चालू लागली. त्यांच्या हस्ताक्षरही मोत्याप्रमाणे सुंदर आहेत. आपले आई बाबा हेच आपले मार्गदर्शक, दिशादर्शक असतात ते जसे वागतात त्याप्रमाणेच त्यांची मुले वागत असतात. त्या पद्धतीने आमच्या वडिलांचे हस्ताक्षर पाहून आम्हा तिन्ही भावंडांचे  हस्ताक्षर सुंदर आहेत. याचा उपयोग आम्हाला आमच्या नोकरीच्या कालावधीमध्ये खूप होतो. त्यांचे विद्यार्थी हे मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहेत पण त्यांनी लावलेल्या जिव्हाळ्यामुळे ते कुठेही असले व घरी आले की ते आमच्या वडिलांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत याशिवाय दुसरे एका शिक्षकाला काय हवे? त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना वडिलांची माया लावली यामुळेच हे शक्य झाले. आज ते सुखी समाधानी आहेत. आजारपणामुळे आज त्यांच्यावर बंधने आलेली आहेत, पण नेहमी सतत मनामध्ये दुसऱ्यांच्या चांगल्या चा विचार करणे, त्यांच्याबद्दल प्रेमभावना ,आदर भावना व सद्भावना व्यक्त करणे हे ते करत असतात. ज्याच्या घरात आई वडील सुखी समाधानी ते घर एका मंदिराप्रमाणे पवित्र असते. ते भाग्य आम्हाला लाभले. खरंच आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. पण समाजामध्ये, बाहेरच्या जगामध्ये जेव्हा मी पाहते तेव्हा अनेक वेळेला मनाला दुःख, वेदना होतात. 

आज जेव्हा वृद्धाश्रमाकडे पाहतो त्यावेळी असे दिसते की या वृद्धाश्रमामध्ये असणारे जे पुरुष आहेत ते कोणाचे तरी वडील असतील पण त्यांच्या मुलांनी त्यांना या वृद्धाश्रमात आणून दाखल केलेले असते. अशावेळी मला असे म्हणावेसे वाटते की ही मुले बाबा शिवाय जीवन कसे जगतात? हे त्यांच्या कपाळकरंटेपणाचेच लक्षण म्हणावं लागेल. अशा लोकांना माझी एवढेच सांगणे आहे की तुम्ही काय करत आहात? आपल्या मुलांच्या समोर कोणते उदाहरण ठेवत आहात? उद्या तुमचा भविष्य असेच असणार आहे कारण तुम्ही तुमच्या मुलांना असेच संस्कार देत असणार असाल तर आज तुम्ही तुमच्या वडिलांना जर बघत नसाल तर उद्या तुमची मुलेही तुम्हाला नक्कीच बघणार नाहीत हे लक्षात ठेवले पाहिजे. समाजामध्ये याबद्दलची जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. सर्वांच्या मनामध्ये आपल्या वडिलांच्या बद्दलची कृतज्ञतेची भावना सतत व्यक्त होत राहिली पाहिजे. जेणेकरून आपले वडील आपल्या कुटुंबाकडे पाहून आपल्या कुटुंबातील व्यक्तींची आपल्यावरील प्रेम पाहून कृतार्थपणे जगतील.
मला माझ्या बाबांच्या बद्दल एवढेच म्हणावेसे वाटते
  देवतुल्य माझे आई बाबा,
  नाही दुजा इथे स्थान.
  सर्वस्वाची देऊन आहुती,
  राखीन सदैव त्यांचा मान.
जागतिक पितृ दिनाच्या वडिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.


          माझे बाबा

प्रेमस्वरुप सिंधु ,
आहेत माझे बाबा.
मनावर असतो आमच्या ,
नेहमीच त्यांचा ताबा .

धीरगंभीर संयमी चेहरा,
प्रोत्साहनप्रसंगी होतो हसरा
संदेश जीवनी स्वताः देतसे,
साधी राहणी अंगीकारा .

लेखणीवर आहे ताबा ,
हस्ताक्षर जसे सुंदर मोती.
पाहताच मन मोहून जाते ,
सकलजन निरखून पाहती.

शिक्षणक्षेत्र पवित्र केले ,
विद्यार्थीप्रीय सदा सर्वदा .
निस्वार्थी सेवा विद्यामंदिरात
ज्ञानदानात मग्न सदा .

समाजसेवा पिंड तयांचा,
करुणासागर मायेचा ,सेवेचा
कर्तव्यदक्ष , प्रेरणास्फूर्ती ,
आदर्श व्रतस्थ जीवनाचा .

लेखिका 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड 
९८८१८६२५३०

Wednesday, 28 May 2025

चारोळी (अतिरेकी पावसाळा)


विषय पाऊस झाला अतिरेकी

अवकाळी दहशतवाद्यासारखा
पाऊस झाला अतिरेकी आता 
हवासा वाटणारा नको झालाय
बंद कर तुझ्या पावसाळी बाता 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Sunday, 25 May 2025

चारोळी


विषय खंत मनाची 

जाळते जीवाला खंत मनाची 
व्यक्त होण्या धडपडत असते 
तमा नसावी कशाचीच कुणाला
नाहीतर जाळ्यात अलगद फसते

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी

विषय... शब्दांच्या ह्या सुगंधी वाटा.

मन मोकळे करून सोडतात 
शब्दांच्या ह्या सुगंधी वाटा 
अक्षररूपी प्रकट होतात 
जसा धाग्यांना विणतो धोटा 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Friday, 23 May 2025

डोळे

विषय आम्ही दोघे

 शेजारी शेजारी आम्ही दोघे 
भेट कधी ना होते आपली 
पाहतो आम्ही सर्वांना सर्वत्र 
स्वतःला पहायची इच्छा राहिली.

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Saturday, 22 February 2025

चारोळी (फुल गुलाबाचे)

गुलाबाचे फुल

 फुल गुलाबाचे प्रतीक प्रेमाचे 
प्रेम भावना व्यक्त करण्याचे 
नाना रंगात नाना भाव दडले
काम दोन हृदयांना जोडण्याचे

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Sunday, 16 February 2025

कविता (प्रेम दिवस)

विषय - प्रेम दिवस 

संगणक झाले तो आणि ती 
गुलाबी टोपी निळ्या पडद्यावर 
भाव मिश्किल असती डोळ्यात
 फुल गुलाबी साहेबी टोपीवर

प्रेमाचा दिवस चल साजरा करू 
आजचा दिवस विश्रांती घेऊ 
जाणून घेण्या एकमेकाचे मन 
हात एकमेकांचा हाती घेऊ

चौकोनी चेहऱ्यावर गुलाबी ओठ 
कीबोर्ड सांगे गुज मनीचे 
माऊस आहे मदतीला तयार
सी पी यु म्हणजे प्रतिक हृदयाचे

दिवस व्हॅलेंटाईनचा करू साजरा 
संदेश प्रेमाचा एकमेकां देवू
हवाच कशाला खास दिवस? 
रोजच एकमेकांना सहाय्य देऊ 

अणाभाकांनी वचनबद्ध होऊ 
नवीन तंत्रज्ञान जगास कळवू 
झाले पूजन फुलांनी आपले 
प्रेम साऱ्यांचे सहज मिळवू 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Saturday, 15 February 2025

चारोळी (लाल जास्वंद)


 
  *विषय :- *लाल जास्वंद **   

 फुलला मोहक लाल जास्वंद 
भासते मना जणू गणेशमूर्ती
गुण औषधी आयुर्वेदी असती
पसरे चहुबाजू याचीच कीर्ती 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Sunday, 9 February 2025

चारोळी (देहाचे चंदन व्हावे)


विषय.. देहाचे चंदन व्हावे.
असे झीजावे कर्माने जगी
देहाचे या चंदन व्हावे 
गंधाळतील मग चहुदिशा 
नश्वर शरीर हे मागे उरावे. 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

आंबोळी(हृदयातील खरे प्रेम)

 - गुज हृदयातील 

व्यक्त न होता जे कळते 
थेट जाऊन मनाला भिडते 
देवाण घेवाण विचारांची होते
तेच हृदयातील खरं प्रेम असते

गुज हृदयातील ओठी येता 
शब्द सुमने प्रेमाची बरसती
संकेत नजरेचा गाली लालीमा 
अधर हास्यास उमलती 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Saturday, 1 February 2025

अभंग ( ऋण माऊलीचे )

रविवारीय स्पर्धेसाठी

अभंग

विषय- ऋण माऊलीचे

नाही विसरणार।ऋण माऊलीचे।।
छान सावलीचे।शिरावरी ।।१ ।।

आधार घराची।आभाळ प्रेमाचे।।
झाकते सर्वांचे। अपराध ।।२।।

सावरे कुटुंब।एकत्र ठेवते।।
एकोपा राखते।सर्वांमध्ये।।३।।

शान ती घराची।अभिमान आहे।।
प्रेमझरा वाहे। काळजात।।४।

ममता अपार।जगी आहे थोर।।
नाचे मनमोर। हृदयात।।५।

वंदन आईला।मनस्वी करते।।
मान मी राखते।सदोदित।।६।।


कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Friday, 31 January 2025

चित्र काव्य

चित्र काव्य 

भविष्य माझे आरशात न्याहाळताना 
प्रतिमा सेवेची प्रतिबिंबित झाली
पाहून खांद्यावरची जबाबदारीची जाणीव 
एक विचारमग्न झाली, दुसरी हसली

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Thursday, 30 January 2025

चित्र चारोळी



चटके सोसून तोंडाला चूल शिजवते अन्नाला
जणू प्रतीकच मानवी जीवनाची 
सुखदुःखाच्या जीवन चुलीवर 
 चवच न्यारी या जेवणाची 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Wednesday, 29 January 2025

महात्मा

महात्मा 

पत्करून अहिंसेचा मार्ग 
करून जनतेचा विचार मनी
कास सत्याची कधी न सोडली 
पंचा काठीची साथ सदैव लाभली 
प्रयोग सत्याचे करून अनेक 
प्रेरक जनास ठरल्या जगी
स्वच्छतेचा आदर मनी सदैव 
उपमा दागिन्याची सुंदर हस्ताक्षराला
वंदन करूया थोर महात्म्याला 

श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड

चारोळी (एक शब्द)

एक शब्द 

संघर्षमय जीवनात वावरताना 
एक शब्द आधाराचा देतो दिलासा 
दुःखी जीवन झाले सुखी तर 
कसा देशील बरे याचा खुलासा? 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड

चारोळी (उडुनी जा पाखरा)


विषय- जा उडूनी पाखरा

आयुष्याच्या रंगमंचावर खेळताना 
शोधती सर्वजण आपला आसरा 
बाळगून निस्वार्थी सेवाभाव जीवनी 
जा उडून मानवरुपी पाखरा 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Tuesday, 28 January 2025

चारोळी (आसुसलेले किनारे)

  चारोळी 
आसूसलेले किनारे
आयुष्याच्या संध्याकाळी निवांत 
नात्यांची वाट पाहती किनारे आसुसलेले 
भाव भरल्या आसक्त नजरांनी 
लोचने मात्र आसवांनी डबडबलेले

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Monday, 27 January 2025

चारोळी (राधा कृष्ण)

राधा कृष्ण 

मनी राधाकृष्णाच्या मोरपिसी भाव 
विणा हाती हृदयी भक्ती खुले
सुमने शोभती कुंतली चपखल
प्रेमपुष्प युगुलांत अलगद फुले

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Wednesday, 15 January 2025

चारोळी (पतंग )



 विषय - पतंग

पतंग आशेचा उडाला गगणी
निर्धाराचा मांजा हाती धरला 
सुखदुःखाचे हेलकावे खात 
उंच उंच हा वरवर निघाला

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर