Saturday, 5 October 2024

कविता रमाबाई रानडे



    शिर्षक
स्त्री उद्धारक रमाबाई 

स्त्री उद्धारक , समाजसुधारक 
रमाबाई रानडे म्हणती तयाला 
चळवळ समान अधिकाराची
स्त्री मुक्तीसाठी तयार लढायला

पती महादेव नवविचारांचे
शिक्षित केले सहचारिणीला 
पत्करला विरोध समाजाचा 
साथ सामाजिक चळवळीला

व्यस्त आयुष्य समाजसुधारण्या
फोडली वाचा स्त्री मुक्तीसाठी 
हुजुरपागा जागा स्त्री शिक्षणाची
अर्पण जीवन देशसेवेसाठी 

भेट मनोरुग्णांची घेतली
बालसुधारगृही मन रमले
मतपरिवर्तन स्त्री कैद्यांचे
समवेत सण साजरे केले

छेदून सीमा भौगोलिक 
सर्वत्र पोहचली करण्या सेवा
केंद्र प्रशिक्षणाचे उदया आले
वाटे कार्याचा सर्वास हेवा

आधारस्तंभ सदा विधवांच्या 
गौरवार्थ पोस्ट तिकीट निर्मिले
वसा समाजसुधारणेचा हाती
त्यांना मी मानाने वंदिले 

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड

Thursday, 3 October 2024

कविता फातिमा शेख

काळ घोर निराशाजनक 
न स्वातंत्र्य स्त्री जातीला 
शिक्षणाची तर बातच सोडा
ना महत्त्व तिच्या विचाराला

जन्म मुस्लिम घराण्यातील 
मोठेपणा मनाचा आचारातून
साथ लाभली घरातून छान 
ज्ञानगंगा वाहिली विचारातून 

सावित्री मातेचे कार्य महान 
भेट घडली प्रशिक्षण स्थळी
जमली गट्टी घेतला वसा
शिक्षणासाठी सज्ज जोडगोळी

बहिष्कृत ज्योतिबा सावित्री 
ज्ञानार्जनाचे समाजाविरुद्ध काम
दिला आसरा ती थोर फातिमा 
मदतीसाठी सदैव तयार विना दाम

प्रसिद्धीपरान्मुख फातिमा शेख 
दखल गुगलची डुडलद्वारे खास
समाजातील दलितांसाठी श्रमली 
सदैव स्त्री शिक्षणाची आस

प्रथम स्त्री शिक्षिका मुस्लिम 
सामोरी समाजरोषाला धैर्याने 
महान, अलौकिकेतेचे उदाहरण 
अविस्मरणीय तिच्या शौर्याने 

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

Monday, 5 August 2024

चित्र चारोळी


विषय :चित्र चारोळी

अलंकृत माता बसली स्तनपाना
वात्सल्याचे हास्य वदनी विलसते
बालसुलभ चाळ्यांसह दुग्ध प्राशन
वसने,स्वर्ग अप्सरा धरेवर भासते

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

Sunday, 7 July 2024

२१ व्या शतकातील स्त्री

21 व्या शतकातील स्त्री

घे तुझ्या कर्तुत्वाची भरारी
अष्टपैलू तू दुर्गाभारी
सरस्वतीच्या आशीर्वादाने
पावले लक्ष्मीची आली दारी

हे सुवचन सार्थ करणारी आजची स्त्री आज सर्वत्र सर्व क्षेत्रात दैदिप्यमान यश शिखर गाठत असताना आपल्याला दिसत आहे. आपल्या सहनशीलता आणि सोशिकता या गुणांच्या आधारावर ती येणाऱ्या सर्व संघर्षावर सर्व समस्यावर उपाय शोधत आगेकूच करत आहे.आजचे यशाचे बोर्ड सर्वत्र आपण पाहतो त्यामध्ये मुलांच्या पेक्षा मुलींच्या फोटोंचे दर्शन जास्त घडते. टक्केवारी मध्ये सुद्धा मुलीच पुढे दिसतात. याचा अर्थ आपण काय घ्यायचा? काय मुले अभ्यास करत नाहीत ? अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत ? का त्यांना कशाचीच भीती नाही? शाळेमध्ये अध्यापनाचे कार्य करत असताना हा फरक मला नेहमी दिसून येतो. शिकवत असताना तर आम्ही सर्वांना सारखेच शिकवत असतो पण मुलांचे शिकण्याकडे लक्ष कमी व दंगा करण्याकडे लक्ष जास्त असते. पण हल्ली मुलींचेही दंगा करण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते. तरीही त्यांची अभ्यासातील गुणवत्ता ही टिकून आहे. यावरूनच स्त्री किती चतुरस्त्र आहे हे दिसून येते.

21 व्या शतकातील स्त्री ही लक्ष्मी, सरस्वती व दुर्गा या सर्वांचे रूप धारण करत समाजात वावरत असताना दिसते. आदिकालापासून आत्ताच्या विज्ञान युगापर्यंत स्त्री शिक्षणाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच गेले आहे व त्याचा उपयोग स्त्रीने पुरेपूर करून घेतलेला आहे. ज्ञानसागरातील विचार मोत्यांचा वापर करून आजची लक्ष्मी अर्थार्जनासाठी बाहेर पडली आहे. घरातून बाहेर पडल्यापासून संध्याकाळी परत घरात येईपर्यंत तिला अनेक संघर्षाला सामोरे जावे लागते. वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्श,विचित्र व अर्थपूर्ण नजरांचा सामना करत तिला आपल्या कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत नाकी नऊ येतात. हा अनुभव निम्म्या स्त्री जातीला तर येतोच. आजच्या वाढत्या महागाईमुळे घरातील स्त्री आणि पुरुष दोघेही काम करत असतील तर घरातील सर्व लोकांच्या गरजा,मुलांचे शिक्षण हे सहजी पूर्ण होते अन्यथा आर्थिक ओढाताण निर्माण होते. त्यासाठी तिला नोकरी ही करावीच लागते. नोकरी करत असतानाच बाकीच्या जबाबदाऱ्या सांभाळत, घरच्या जबाबदाऱ्यांच्या बरोबर मुलांची, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही तिच्यावरच येते. आपल्या मुलांची जडणघडण चांगल्या दृष्टीने व्हावी यासाठी स्त्री अथक  प्रयत्न करत असते. पण तिच्या या कष्टाची जाणीव किती जणांना असते? हल्ली सुशिक्षितता व सुधारणा झाल्यामुळे बऱ्याच कुटुंबामध्ये स्त्रीला मानाचे स्थान मिळत आहे. पण हे बोटावर मोजण्यापुरतेच आहे.

आज कित्येक घरकाम करणाऱ्या मजदूर महिला कष्टाची कामे करत असतात व स्वतःचे घर चालवत असतात. त्यांच्या घरी त्यांचा नवरा आरामात बसून बायकोचे पैसे खर्च करत असतो. तिला पैसे नाही दिले तर मारहाण करतो व जबरदस्तीने तिच्याकडून पैसे काढून घेतो असे चित्रही आपल्याला दिसून येते. पण अन्याय ,अत्याचार सहन करण्यालाही सीमा असते प्रसंगी हा त्रास सहन न होऊन शेवटी स्त्री  दुर्गा,काली चे रूप धारण करते व स्वयं शासनाने तिच्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा करते. स्त्रियांच्या साठी अनेक कायदेही आहेत पण त्याचा उपयोग प्रत्येक स्त्रीने योग्य रीतीने केला पाहिजे.

एवढे असून सुद्धा आज समाजामधली परिस्थिती पाहता संस्कारात आपण कुठेतरी कमी पडलो आहोत का असे वाटत आहे कारण अनेक तरुण मुली वाईट मार्गाला लागत आहेत तर काही आपल्या आई-वडिलांना सोडून नुकताच ओळख झालेल्या मुलाबरोबर पळून जात आहेत. त्यांना आपल्या आई वडिलांच्या मानसन्मानाबद्दल  कुठल्याही प्रकारची भावना मनामध्ये येत नाही. तसेच अनेक स्त्रियांच्या बद्दल आपण वर्तमानपत्रकामध्ये बातम्या वाचत असतो की आपल्या लहान मुलांना सोडून आपल्या प्रियकराबरोबर त्या पळून गेलेल्या आहेत. अशी कशी परिस्थिती बदलत गेली ? हा एक मोठा प्रश्नच आहे. माझ्या मते असे होणे हे अत्यंत चुकीचे आहे,लाजिरवाणे आहे. यासाठी प्रत्येक स्त्रीने मनापासून याचा विचार करून योग्य रीतीने राहिले पाहिजे तरच आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार होतील.परवाच सोशल मिडीयावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला.त्यामध्ये नशेत चूर असणाऱ्या मुली पाहिल्या व मनात चर्र झाले.कुठे चाललाय आपला समाज? 

हे सर्व कुठेतरी थांबले पाहिजे.यासाठी सर्वांनी एकमेकांना दोष देण्याऐवजी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.आपल्या लाडक्या मुला-मुलींचे फालतू लाड न करता प्रसंगी कठोर झाले पाहिजे.आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणे सोडले पाहिजे.नाहीतर येणारा भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही.गेलेली वेळ परत येणार नाही.तेंव्हा सर्वांनी वेळीच सावध व्हावे. २१ व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्या पाल्याला खासकरून मुलींना सक्षम बनवा.समाजाची मानसिकता बदलायला हवी.तरच स्त्री बिनधास्त फिरु शकेल.

लेखिका
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
हेरवाड हायस्कूल हेरवाड
९८८१८६२५३०

माहेर

अष्टाक्षरी
विषय- माहेर

असे सुरेख माहेर
मना फार सुखावते
आठवण हर घडी
लोचनात ओलावते

आईबाबा पांघरूण 
दु:खावर पांघरती 
सुख पदरी घालती
माया नेहमी करती

माहेरची नातीगोती 
घट्ट मिठी ‌स्नेहधागा
साठवण आयुष्यात 
जशी शोभे चंद्रभागा 

बंधू माझा पाठीराखा 
लाज राखीची राखतो
निरांजने लोचनांची
सदा तेवत ठेवतो

माया सागर प्रेमाचा
नाही आटत कधीही 
वाहे मनात सर्वांच्या
व्यथा खूपल्या तरीही 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड,ता.शिरोळ
जिल्हा.कोल्हापूर
९८८१८६२५३०

Monday, 26 February 2024

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०NEP

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP  )

दररोजच्या जीवनात बदल अत्यंत गरजेचा आहे.ज्याप्रमाणे साचलेले पाणी पुढे न जाता एकाच ठिकाणी साचून राहते तेंव्हा ते अस्वच्छ होते. व ते वापरण्यायोग्य रहात नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीत नवनवीन बदल होत राहिले पाहिजेत.व प्रत्येकाने ते येणारे बदल सकारात्मकतेने स्विकारलेच पाहिजेत. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातही बदल होत आलेले आहेत व हे बदल काळाची गरज असल्यामुळे ते झालेच पाहिजेत. सध्याचा शिक्षण क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 होय.1968,1986 नंतर 34 वर्षानंतर आता 2020 ला हा बदल केलेला आहे.यामध्ये शिक्षणपद्धतीत अमुलाग्र बदल केलेला आहे. तो सहजासहजी सर्वांच्या पचनी पडणे सुरवातीला अवघड आहे.दोन वर्षापूर्वी  कोरोना महामारीच्या काळातील शिक्षणपद्धती पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सुरु होती. प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या तरी शिक्षण चालू राहू शकते,हे अधोरेखित झाले आहे. यामध्ये सरकारने विविध योजना, शैक्षणिक आभासी केंद्रे तयार केली होती.ज्याद्वारे शिक्षण दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहचवले जात होते.
सध्याचे येऊ घातलेले नवीन शैक्षणिक धोरण हे एक प्रकारचे आधुनिक बदललेल्या शैक्षणिक पद्धतीचा नमुना आहे.काय आहे हे धोरण? या धोरणाचे उद्देश पुढीलप्रमाणे- १) 2030 पर्यंत शालेय शिक्षण 100% सर्वांपर्यंत पोहचवण्याचा आहे.
२) पूर्वप्राथमिक विद्यालयापासून माध्यमिक स्तरापर्यंतच्या शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व सार्वभौमिकीकरण करणे.
३) वयवर्षे 3 ते 18 वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणने.
डॉ. कृष्णास्वामी कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली हे धोरण आखले गेले.याद्वारे शिक्षणक्षेत्रात महत्वपूर्ण बदल केले गेले.मोठा बदल केला गेला तो म्हणजे सर्वात प्रथम MHRD मिनीस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजेच मानव संसाधन विकास मंत्रालय हे नांव बदलून शिक्षा मंत्रालय (मिनीस्ट्रीऑफ एज्युकेशन)असे करण्यात आले.तसेच पूर्वीचा शिक्षणाचा 10 + 2 हा स्तर बदलून आता 5 + 3 + 3 + 4 असा करण्यात आला आहे. पहिला टप्पा वयवर्षे 3 पासून वयवर्षे 5 पर्यंत असणार आहे. आनंददायी शिक्षण या टप्प्यात दिले जाणार आहे. मुलांनी गाणी, गोष्टी, गप्पा या माध्यमातून शिकायचे आहे. या टप्प्यावर कोणत्याही प्रकारची परीक्षा असणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना तणाव येणार नाही. ती सहजपणे शिकतील.यानंतरचा दुसरा टप्पा 3 मध्ये इयत्ता 3री,4थी,5वी असा असणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या टप्प्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्येच शिकता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिकताना कोणतीही अडचण येणार नाही पण इंग्रजी भाषेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.या टप्प्यावर परीक्षेची सुरवात होणार म्हणजे परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे हळूहळू विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती कमी होईल.पुढील टप्पा 3 मध्ये 6वी, 7वी, 8वी असा आहे. या मधल्या स्तरावर विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच विविध कोर्सेस शिकवले जाणार जसे की,कंप्यूटर, छोटे छोटे कोर्सेस उदा.शिलाई,जेवण बनवणे,माळीकाम इ.कोर्सेस.हे कोर्सेस विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे निवडता व शिकता येतील.त्यामुळे शिकताना विद्यार्थ्यांना आंनद मिळेल.गणित, विज्ञान, कला या विषयांबरोबरच विद्यार्थ्यांना एक भारतीय भाषाही शिकता येणार आहे. यानंतरचा टप्पा 4 .यामध्ये इयत्ता 9वी, 10वी, 11वी, 12वी असा स्तर असणार आहे.ही सेकंडरी स्टेज आहे.या टप्प्यावर परीक्षा पद्धती ही सेमिस्टर पद्धतीने घेतली जाणार आहे.टप्या-टप्याने घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण येणार नाही.तसेच वेगवेगळे शिक्षणाचे प्रवाह नसणार तर कला,विज्ञान,वाणिज्य या तीनही शाखेतील आपल्याला आवडेल तो विषय विद्यार्थी घेऊ शकतात.त्याचबरोबर पूर्वीची पाठांतर पद्धती बंद करून वैचारिक पद्धती आणली जाणार आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही परदेषी भाषा शिकता येणार आहे.
सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे बी.ए,बी.कॉम,बी.एस.सी. अशी असणारी डिग्री पद्धत बंद होणार व त्याऐवजी चार वर्षाचे चार शैक्षणिक वर्षाचे भाग पाडले जाणार. त्यामध्ये बारावीनंतर एक वर्ष शिक्षण पूर्ण झाले की,विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिले जाणार. दुसऱ्या वर्षानंतर डिप्लोमा पदवी,तिसऱ्या वर्षानंतर डीग्री प्रमाणपत्र तर चौथ्या वर्षानंतर विद्यार्थ्यांना रिसर्च म्हणजेच संशोधन प्रमाणपत्र दिले जाणार. यामुळे फायदा असा होणार की, पूर्वी बी.ए.,बी.एस.सी.,बी.कॉम ची पदवी पूर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना कुठे नोकरी करता येत नव्हती. शिवाय शिक्षण पूर्ण नसल्याने अर्धवट शिक्षणाचा काही उपयोग होत नव्हता. पण आता एक वर्ष शिक्षण झाले तरी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. व त्याआधारे तो नोकरी किंवा व्यवसाय करु शकतो.तसेच भविष्यात त्याला शिकायचे असेल तर तो पुन्हा प्रवेशित होऊन जिथून शिक्षण थांबले आहे तिथून पुढील शिक्षण घेऊ शकतो. त्यानंतर दोन वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतो.त्याचप्रमाणे एम.फील.बंद करून पीएचडी. चे शिक्षण चार वर्षे करण्यात आले आहे.त्याचबरोबर
सर्वांना समान शिक्षण मिळण्यासाठी शालेय फी सर्वत्र एकसमान असणार आहे.जेणेकरून सर्वांना एकाच छताखाली शिक्षण घेता येणार आहे.आनंदाची गोष्ट म्हणजे प्रात्यक्षिक ज्ञानावर भर दिला जाणार आहे.कारण ऐकून व डोळ्याने पाहून घेतलेल्या शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष कृती करुन घेतलेले शिक्षण,ज्ञान हे विद्यार्थ्यांना परीपूर्ण व सक्षम बनवते.तसेच भविष्यात परदेशातील नामांकित 50 युनिव्हर्सिटी भारतात आपल्या शाखा चालू करु शकतात.त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना भारतातच राहून शिक्षण घेणे शक्य होणार आहे. विविध विभागासाठी वेगवेगळ्या शाखा चालू करण्यात येतील.शिक्षकांना सक्षम बनविण्यासाठी चार वर्षांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्यात शिक्षणाप्रती रुची व अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी नक्कीच होईल.मूल्यमापन पद्धतीत स्वयंमूल्यमापन व दुसऱ्या व्यक्तींच्याकडून मूल्यमापन केले जाणार असल्याने विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षकांनासुद्धा नेहमी अपडेट रहावे लागणार आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तंत्रस्नेही बणून संगणकीय युगातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भूक भागवावी लागणार आहे. तरच शिक्षक या स्पर्धेत टिकून राहू शकतो.
यासाठी येणाऱ्या आव्हानात्मक काळासाठी म्हणजेच येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्वतःला सिद्ध करुन सक्षम बनण्यासाठी सर्वांनी सकारात्मकता अंगी बाणवली पाहिजे.नवनवीन ज्ञानाचा उपयोग करून तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करून येणाऱ्या तंत्रस्नेही पिढीच्या प्रत्येक समस्येवर उपाय करण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे.

श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
मुख्याध्यापिका, हेरवाड हायस्कूल, हेरवाड
9881862530

शिरोळ तालुक्यातील साहित्यिकांची साहित्यातून समाजसेवा

शिरोळ तालुक्यातील साहित्यिकांची साहित्यातून समाजसेवा

एखाद्या देशाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर त्या देशातील साहित्य आपल्याला सर्व काही सांगून जाते कारण साहित्य समाजमनाचा आरसा असते.साहित्य म्हटले की डोळ्यासमोर उभे राहतात पुस्तके, त्यातील लेख,कथा,कविता, कादंबरी.यालाच वाड:मय असेही म्हणतात. साहित्य का उदयास आले? तत्कालीन समाजातील चालणाऱ्या प्रथा या काही चांगल्या तर काही वाईट,या सर्वांच्याबद्दल आपल्या मनातील विचार प्रकट करून लोकांपर्यंत ते पोहचवणे.त्यांच्या मनावर राज्य करणे.त्यांना परिस्थितीशी अवगत करणे हे या गरजेपोटी साहित्य निर्मिती झाली. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले ते सारस्वत असेही साहित्य लिहणाऱ्या साहित्यिकांना म्हटले जाते. ज्यावेळी आपण खूप वाचतो व त्यानंतर आपल्या मनात विचारांचे काहूर माजते.कींवा समाजातील अनेक घटना पाहताना, सोसताना मनाची घालमेल होते,व ती शब्दरुपाने कागदावर उतरते.ते साहित्य असते.माझ्याबाबतीत तर ते खरे आहे. कारण अशा मानसिक स्थितीतूनच माझे साहित्य तयार झाले आहे. फक्त लिखाण करुन चालत नाही. तर ते प्रकाशित करून लोकापर्यंत पोहचले पाहिजे.सर्वत्र असे प्रयत्न केले जातात. त्याचप्रमाणे शिरोळ तालुक्यातील साहित्यिक साहित्य क्षेत्रात भरारी मारत आहे.

जयसिंगपूर शहर म्हटले की जेष्ठ साहित्यिका निलम माणगावे यांचे नांव घेतले जाते. गेली अनेक वर्षे त्या साहित्य सेवा करत आहेत. त्यांनी लिहलेल्या पुस्तकांचा, लेख,कवितांचा विविध विद्यापिठामार्फत अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर श्री.मोहन पाटील, बाळ बाबर,डॉ. महावीर अक्कोळे या जेष्ठ साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून कधी जहाल तर कधी मवाळ भाषेतून समाजप्रवृत्तीवर लिखाण केले आहे. जयसिंगपूर कॉलेजचे माजी प्राचार्य श्री. राजेंद्र कुंभार यांनी शाहू महाराज, महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आपल्या लेखणीतून व वाणीतून सर्वत्र केला व करत आहेत. शिरोळ तालुक्यातील साहित्य संमेलनाची जबाबदारी त्यांनी स्विकारली व आपल्या कॉलेजच्या सहाय्याने विविध शाळांमध्ये साहित्य संमेलने घेतली व तेथील विद्यार्थ्यांना साहित्य व साहित्य संमेलनाची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांना लिहते करण्यासाठी त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद होता. या निमित्ताने शिरोळ तालुक्यातील अनेक साहित्यिक एकत्र आले. एकमेकांच्या ओळखी झाल्या.

साहित्य लेखनाबरोबर साहित्य प्रकाशन क्षेत्रातही शिरोळ तालुका मागे नाही.कवितासागर प्रकाशन व प्रकाशक श्री. सुनील पाटील हे नाव साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना माहीत नाही असे नाही, कारण डॉ. सुनील पाटील यांच्या रोमारोमात साहित्य आहे. त्यांनी माझ्यासह अनेक साहित्यिकांनी प्रकाशात आणले. त्यांचे घर हे मोठे पुस्तकालयच आहे. घराच्या भिंती न दिसता सर्वत्र पुस्तकेच पुस्तके दिसतात.त्यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. सध्या त्यांच्या नावाची चर्चा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी झाली आहे ही अभिमानाची बाब आहे.गझल क्षेत्रातही शिरोळ तालुका मागे नाही. कुरुंदवाडचे धन्वंतरी डॉ. दिलीप कुलकर्णी, जयसिंगपूर कॉलेजच्या प्राध्यापिका प्रा सुनंदा शेळके यांच्या गझला वाचनीय व संदेश देणाऱ्या असतात.डॉ. कुलकर्णी हे  पेशाने डॉक्टर असूनदेखील त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत,त्याचबरोबर त्यांना अनेक साहित्यिक पुरस्कार मिळाले आहेत. मुक्तेश्वर प्रतिष्ठाणच्या माध्यमातून ते वाचन चळवळीला प्रेरणा देतात व विविध साहित्यिकांचा कार्यक्रम आयोजित करून समाजमनावर योग्य विचारांचा ठसा उमटवतात.कुरुंदवाड येथील दिलीप सुतार, श्री. सच्चिदानंद आवटी, साहिल शेख यांनी आपल्या लेखणीतून समाजातील प्रश्नावर आवाज उठवला आहे.साहिल शेख आपल्या बंडखोर अशा विशिष्ट लेखणीतून आपले विचार मांडतो आहे.  श्री.मनोहर भोसले गुरुदत्त कारखान्यात लाईनमन म्हणून कार्यरत असताना साहित्य क्षेत्रात घोडदौड करत आहेत.त्यांनी केलेल्या लिखानाला पुरस्कार प्राप्त झाले आहेत. जाताजाता रोजच्या घडणाऱ्या घडामोडींवर त्यांचे लिखाण असते.आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सौ.मनिषा वराळे यांनी आपल्या लिखानातून स्वत:चे एक स्थान निर्माण केले आहे. आरोग्य सेविकेचे काम करत त्यांची साहित्य सेवा अविरतपणे चालू आहे.ज्योतिष शास्त्रातही श्री ब्रम्हविलास पाटील यांनी भरपूर लेखन केले आहे. रिटायर्ड शिक्षक श्री. प्रविण वैद्य यांनी वैचारिक लेख प्रसिद्ध केले आहेत. धार्मिक लेखणातही शिरोळ तालुक्यातील साहित्यिक कमी नाहीत यामध्ये प्रामुख्याने धर्मानुरागी श्री विजय आवटी, विजय बेळंकी सर यांचे नांव येते.प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील डॉ. ज्युबेदा तांबोळी यांनी आपल्या लेखणीतून समाजातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. लेखणीला वयाची मर्यादा नसते हे त्यांनी दाखवून दिले आहे. गृहीणीचे काम करत असताना सुद्धा आपल्या लेखणीतून आपले विचार व्यक्त केले जाऊ शकतात.हे लेखिका मेघा उळागड्डे यांनी दाखवून दिले आहे.डॉ. राजश्री पाटील या आपला दवाखाना सांभाळत येणाऱ्या आजारी व्यक्तींच्यावर उपचार करत असताना येणारे अनुभव आपल्या साहित्यातून मांडले आहेत.त्यांच्या पुस्तकांनाही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.चिपरी सारख्या खेडेगावातील नीवृत्त शिक्षक श्री.रामगोंड पाटील यांनीही रोजच्या जीवनावर व अध्यात्मिक विषयावर लेखन केले आहे.

शिरोळ तालुक्यातील जवळपास सर्वच क्षेत्रातील साहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या जोरावर समाजातील लोकांचे आपल्या लेखणीतून समाजातील लोकांचे उद्बोधन केले आहे.चांगले लेखक समाजातील विविध प्रकारच्या परिस्थितींचे ,समस्यांचे,चांगल्या वाईट प्रसंगाचे आपापल्या कल्पनेनुसार ते प्रसंगांचे शब्दांकन करतात. कोणतेही पुस्तक कींवा लेखन असू दे त्यामध्ये समाजाचे प्रतिबिंब असते."जे न देखे रवी ते देखे कवी" असे म्हटले जाते ते यामुळेच.साहित्त्यिकांनी आपली जबाबदारी ओळखून आपल्या साहित्यात कल्पनेचा वापर जरूर करावा पण त्या साहित्यातून वाचकांना एक चांगला संदेश दिला पाहिजे. पुस्तके मानवाचे चांगले मित्र आहेत असे म्हणतात ते यासाठीच.समाजाला भरकटवणारे, अनितीकडे नेणारे गलिच्छ लेखन कधीच करु नये.तसा वाचकवर्ग थोडा जरी असला तरी.तशाप्रकारचे लेखन शिरोळ तालुक्यात  माझ्या नजरेत आतापर्यंत तरी आले नाही.हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या शिरोळ तालुक्यातील सर्व साहित्यिक शब्दांच्या माणिक-मोत्यांच्या आधारे जनमानसात संस्काराचे लेणे लिलया देण्यासाठी सदैव तत्पर आहेत.

लेखिका
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
मुख्याध्यापिका
हेरवाड हायस्कूल, हेरवाड
9881862530